मंडई उरली आता फक्त बाजार आणि नाटकांसाठी
By Admin | Updated: November 16, 2015 00:59 IST2015-11-16T00:59:25+5:302015-11-16T00:59:25+5:30
काळाचा महिमा म्हणा किंवा अन्य काही पण ग्रामीण भागात दिवाळीच्या मुहूर्तापासून सुरू होणाऱ्या मंडई उत्सवात आता म्हणावा तेव्हढा दम राहिला नाही.

मंडई उरली आता फक्त बाजार आणि नाटकांसाठी
घनश्याम नवघडे नागभीड
काळाचा महिमा म्हणा किंवा अन्य काही पण ग्रामीण भागात दिवाळीच्या मुहूर्तापासून सुरू होणाऱ्या मंडई उत्सवात आता म्हणावा तेव्हढा दम राहिला नाही. या मंडई उत्सवाची जागा आता केवळ बाजार आणि नाटकांनी घेतली, असे वर्णन कोणी केले तरी ते अतिशयोक्ती ठरणार नाही.
पूर्व विदर्भातील चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यात धानाचे पिक मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाते. धानाचा हंगाम साधारणत: जून-जुलै पासून सुरू होतो आणि आॅक्टो.-नोव्हेंबरला संपतो. यावेळेस शेतकरी वर्ग मोकळाच असतो आणि धानाच्या रूपाने लोकांच्या हातात पैसा येण्यास सुरुवात झालेली असते. या मोकळ्या वेळेचा उपयोग वेळ घालविण्यासाठी मंडईच्या रूपाने व्हावा. त्याचबरोबर परंपरेने चालत आलेल्या लोककलांचे जतन व्हावे म्हणूनच मंडईची प्रथा पडली असावी.
नागभीड तालुक्यात कोर्धा, चिकमारा, नवेगाव पांडव, नागभीड येथे दिवाळीच्या मुहूर्तावर या मंडईचे आयोजन होते. तालुक्यातील आणखी अनेक गावांत त्या त्या गावांच्या सोयीने मंडई भरविण्यात येते. मंडईचा हा सिलसिला डिसेंबर महिण्यापर्यंत सुरु असतो. पण दिवाळीच्या मुहूर्तावर झालेल्या मंडईची स्थिती लक्षात घेतली आणि दंडार मंडळाचा प्रतिसाद लक्षात घेतला तर मंडईची कीव आल्यावाचून राहत नाही.
दोन-तीन दशकापूर्वी मंडई म्हटले की एक वेगळाच उत्साह असायचा मंडई मध्ये आपल्या गावच्या दंडार मंडळास सहभागी व्हायचे आहे, म्हणून १५ दिवस अगोदर पासूनच पूर्वतयारी करण्यात येत होती. मंडईच्या आदल्यादिवशी त्याची रंगीत तालीम म्हणून ‘भडकी दंडार’ सादर व्हायची. तत्पूर्वी ज्या गावात मंडईचे आयोजन होते. त्या गावची आयोजक मंडळी गावोगावच्या दंडार मंडळांना खास निमंत्रण पाठवायचे आणि मंडई उत्सवात किमान १० ते १५ दंडार मंडळे सहभागी व्हायचे आणि लोककलेचे दर्शन घडवायचे.
पण हे दिवस आता संपल्यात जमा आहेत. दंडार मंडळे आता दिसेनाशी झाली आहेत. अपवादाने एखादा मंडळ या मंडईत हजेरी लावत असतो. आता या मंडईची जागा केवळ बाजार आणि रात्रीच्या नाटकांनी घेतली आहे. ज्या गावात मंडईचे आयोजन असते त्या गावात हमखास नाटकांचे आयोजन असते.