नामांकनसाठी मिळणार फक्त पाच दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 05:00 IST2019-09-30T05:00:00+5:302019-09-30T05:00:58+5:30
विधानसभा निवडणुकीची अधिसूचना शुक्रवारी २७ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध झाली. ४ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. मात्र, अधिसूचना प्रसिद्ध होताच दुसऱ्या दिवशी चौथा शनिवार आणि तिसºया दिवशी रविवारची सुटी व पुन्हा २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीची सुट्टी आल्याने अर्ज दाखल करण्यासाठी केवळ पाच दिवस मिळणार आहेत.

नामांकनसाठी मिळणार फक्त पाच दिवस
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: विधानसभा निवडणुकीची अधिसूचना शुक्रवारी २७ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध झाली. ४ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. मात्र, अधिसूचना प्रसिद्ध होताच दुसऱ्या दिवशी चौथा शनिवार आणि तिसºया दिवशी रविवारची सुटी व पुन्हा २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीची सुट्टी आल्याने अर्ज दाखल करण्यासाठी केवळ पाच दिवस मिळणार आहेत.
विधानसभा निवडणुकीच घोषणा होऊन आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार २७ सप्टेंबर रोजी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. शुक्रवार ४ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास पूर्ण आठवडा असला तरी अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही. दुसºया दिवशी चौथा शनिवार व अमावस्या आहे. राजकारणात सर्व माफ असण्याची पद्धत सध्या रूढ होत असली तरी आजही बहुतांश जण मुहूर्त पाहूनच अर्ज दाखल करतात. २९ सप्टेंबर रोजी घटस्थापनेचा चांगला मुहूर्त आहे. पण, रविवार आल्याने सार्वजनिक सुट्टीमुळे अर्ज दाखल करता येणार नाही. त्यामुळे पहिले तीन दिवस दाखल अर्जाची संख्या कमीच राहण्याची शक्यता आहे. सोमवार ३०, सप्टेंबर व १ ऑक्टोबर असे दोन दिवस अर्ज दाखल झाल्यानंतर पुन्हा २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीची सुट्टी येत आहे. परिणामी, शेवटचे दोन दिवस म्हणजे ३ व ४ आॅक्टोबर रोजी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी वाढण्याची शक्यता आहे. एरवी सर्वच निवडणुकांमध्ये शेवटचे दोन दिवस अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड असते. मात्र, यावेळी पहिले तीन दिवस मिळत असल्याने आठवडाभरातील चार दिवस उमेदवारी अर्ज दाखल करण्यास वेळ मिळणार आहे.
प्रचाराच्या ताफ्यात तीन वाहनांनाच परवानगी
विधानसभा निवडणुकीची कालावधीत उमेदवारांना प्रचाराच्यावेळी त्यांच्या वाहन ताफ्यात तीनपेक्षा जास्त वाहने वापरता येणार नाही, अशा सूचना निवडणूक विभागाने दिल्या आहेत. निवडणुकीच्या प्रचारासाठी वापरावयाच्या वाहनांची परवानगी संपूर्ण विधानसभा मतदारसंघ क्षेत्रासाठी त्या क्षेत्रातील संबंधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून घेणे आवश्यक आहे. प्रचार कार्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे नोंदणी न करण्यात आलेले कोणतेही वाहन प्रचार कार्यासाठी वापरता येणार नाही, असे निर्देश जिल्हा निवडणूक प्रशासनाने दिले.
कलम १४४ (१) लागू
फौजदारी प्रक्रिया संहिता १९९३ चे कलम १४४ (१) च्या आदेशान्वये जिल्ह्यात हे नियम लागू करण्यात आले आहेत. हा आदेश संपूर्ण २७ ऑक्टोबर २०१९ च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहे. आदेशाचे उल्लंघन झाल्यास दंड संहिता १८६० चे कलम १८८ नुसार कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा दंडाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी कळविले आहे.