गारपीटग्रस्त ९१८ हेक्टर क्षेत्रातील पिकांनाच मिळणार भरपाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:24 IST2021-02-20T05:24:24+5:302021-02-20T05:24:24+5:30
ब्रह्मपुरी, मूल, सावली, नागभीड, सिंदेवाही व अन्य तालुक्यात गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले होते. ...

गारपीटग्रस्त ९१८ हेक्टर क्षेत्रातील पिकांनाच मिळणार भरपाई
ब्रह्मपुरी, मूल, सावली, नागभीड, सिंदेवाही व अन्य तालुक्यात गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले होते. कृषी व महसूल विभागाने पंचनामे करून राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दरानुसार बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी कृषी आयुक्तांकडे अहवाल सादर केला. शासनाने ३ जानेवारी २०२० रोजी दिलेल्या सुचनेनुसार, ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीकडून मदत देण्याबाबत मंत्रिमंडळाने चर्चा केली. दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीलाकडे अहवाल सादर झाला. मात्र, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. गुरूवारी यासंदर्भात घेतलेल्या अंतिम निर्णयानुसार मदत निधीला मंजुरी प्रदान देण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यातील गारपीटग्रस्त ९१८ हेक्टर क्षेत्रात नुकसान भरपाई पात्र ठरले आहे.
पीक पंचनामातील त्रुटीबाबत नाराजी
शेती व बहुवर्गीय फळ पिकांच्या नुकसानीसाठी ३३ टक्के अथवा त्याहून जास्त नुकसान झालेल्या शेतकºयांनाच आर्थिक मदत मिळणार आहे. कृषी सहाय्यक, तलाठी व ग्रामसेवकांच्या संयुक्त पंचनामानुसार बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होणार आहे. स्थानिक स्तरावर केलेल्या पंचनामात काही त्रुटी होत्या. महसूल व कृषी विभागाने सुधारीत अहवाल तयार केला असता तर मदतीचे हेक्टरी क्षेत्र वाढले असते, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.