जुन्यांचा पत्ता नाही, नव्यांची लागवड
By Admin | Updated: August 28, 2015 01:19 IST2015-08-28T01:19:49+5:302015-08-28T01:19:49+5:30
ग्लोबल वार्मिंगसारख्या समस्यांवर मात करण्यासाठी शासनाने शतकोटी वृक्ष लागवड योजना राबवली.

जुन्यांचा पत्ता नाही, नव्यांची लागवड
वृक्ष लागवड योजना : ग्रामपंचायतींचा केवळ देखावा
चंद्रपूर : ग्लोबल वार्मिंगसारख्या समस्यांवर मात करण्यासाठी शासनाने शतकोटी वृक्ष लागवड योजना राबवली. मात्र, या योजनेचा गतवर्षी जिल्ह्यात पुरता फज्जा उडाला. अनेक ग्रामपंचायतीनी वृक्ष लागवड न करताच निधीची उचल केली. एकाही ग्रामपंचायतीकडे जगलेल्या वृक्षांचा आकडा उपलब्ध नाही. ग्रामपंचायतींची चौकशी झाली. मात्र त्याचाही फायदा झाला नाही. आता पून्हा नव्याने वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.
शासनाच्या महत्वाकांक्षी शतकोटी वृक्षलागवड योजनेर्तंगत दरवर्षी प्रत्येक जिल्ह्याला वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट दिले जाते. या उद्दीष्टानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीला वृक्ष लागवड करायची असते. मात्र केवळ शासनाचे अनुदान लाटण्यासाठी अनेक ग्रामपंचायतीनी या योजनेचा मार्ग अवलंबिला आहे.
उद्दीष्टानुसार ग्रामपंचायत प्रशासनाकडून रोजगार हमी योजना, १३ वा वित्त आयोग, पर्यावरण संतुलीत, ग्रामनिधीच्या माध्यमातून वृक्ष लागवड केली जाते. दरवर्षी खड्डे खोदून वृक्ष लागवड होत असली तरी जगलेल्या वृक्षांचा पत्ता नाही.
शतकोटी वृक्ष लागवड योजने अंतर्गत सन २०१४-१५ मध्ये चंद्रपूर जिल्ह्याला १४ लाख ६४ हजार ९६५ वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट देण्यात आले. यापैकी ३० जानेवारी २०१५ पर्यंत ४८९ ग्रामपंचायतींमार्फंत ५ लाख २३ हजार ७४१ वृक्ष लावल्याची प्रशासनाकडे नोंद आहे. यासाठी ७ लाख ६३ हजार ५४ खड्डे खोदल्याचीही नोंद आहे. ही प्रक्रिया सुरुच असली तरी जगलेल्या झाडांचा मात्र पत्ता नाही, अशी स्थिती आहे.
मात्र, ग्रामपंचायत प्रशासन आपण वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट पूर्ण केल्याचे दाखवून शासकीय निधीची उचल करीत आहे. चालू वर्षात जिल्ह्याला वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट अद्याप मिळालेले नाही.
मात्र पावसाळा सुरू होताच वृक्ष लागवडीला प्रारंभ होत असते. ज्या ठिकाणी वृक्ष करपली, त्या ठिकाणी नव्याने वृक्ष लागवड केली जात असल्याचे रोहयोच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)