एकाच योजनेला अनेकदा निधी
By Admin | Updated: May 11, 2015 01:04 IST2015-05-11T01:04:08+5:302015-05-11T01:04:08+5:30
एक योजनेवर एकच निधी खर्च करण्याचा शासनाचा नियम असला तरी पाण्याच्या गंभीर समस्येने कोरपना तालुक्यात शासनाला एकाच योजनेवर अनेक निधी खर्च करण्यास भाग पाडले आहे.

एकाच योजनेला अनेकदा निधी
आशिष देरकर गडचांदूर
एक योजनेवर एकच निधी खर्च करण्याचा शासनाचा नियम असला तरी पाण्याच्या गंभीर समस्येने कोरपना तालुक्यात शासनाला एकाच योजनेवर अनेक निधी खर्च करण्यास भाग पाडले आहे. हा शासनाचा आदेश की अधिकाऱ्याची मर्जी हे अद्याप कळू शकले नाही. पण पाणी पोहचविण्यासाठी पाण्यासारखा खर्च करुन पाणीच पोहचले नसल्याने पाण्याच्या टाकीचा घसा अजूनही कोरडाच आहे.
या प्रकारामुळे गावकऱ्यांची तहान भागणे तर दूर टाकीपर्यंत पाणीच पोहचले नाही. शासनाच्या अनेक योजनांपैकी स्वजलधारा, महाजल योजना, जलस्वराज, टँकरमुक्त योजना, ग्रामीण पाणी पुरवठा, खनिज विकास निधी, वर्दीत वेग अशा कोट्यवधी रुपयांच्या खर्ची घातलेल्या योजनांचा कोरपना तालुक्यात बट्ट्याबोळ झाला असून अनेक गावात पाण्यासाठी हाहा:कार निर्माण झाला आहे. शासनाच्या हलगर्जीपणामुळे काही गावात तर दुहेरी योजना आखावी लागत आहे. मांगलहिरा व थिप्पा येथे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत टाकीचे बांधकाम झाले असतानासुद्धा या दोन्ही गावात जलस्वराज योजनेच्या निधीची उधळपट्टी करण्यात आलेली आहे. मांगलहिरा येथे विहिरीचे खोदकाम झाले आहे. पाणी पुरवठा योजनेंतर्गत पाण्याची टाकीसुद्धा बांधण्यात आली आहे. परंतु पारडीवरुन पाणीच पोहचले नसल्याने पाण्याची टाकी शोभेची वास्तू ठरली होती. अशातच नवीन योजनेद्वारे पुन्हा पाणी पोहचण्याचा प्रयत्न केला असता टाक्या कोरड्याच आहे.
तालुक्यातील अकोला, रुपापेठ, पारडी, कोठोडा, दुर्गाडी, मांगलहिरा हे गाव पारडी पाणीपुरवठा योजनेमध्ये समाविष्ठ होते. मात्र पारडी येथून या गावांना पाणी पोहचणे शक्य नसल्यामुळे या गावांनी वैयक्तिक पाण्याच्या टाकीसाठी प्रस्ताव दिले. टाकी बनल्या, बोअरवेल मारल्या. पण पाणीच नसल्याने टाकीकडे टवकारून पाहिल्याशिवाय गावकऱ्यांच्या नशिबी काही नाही. म्हणजे केवळ एकाच ठिकाणी पाणी पोहचविण्यासाठी वेगवेगळ्या योजनांचा वापर करून कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. मात्र पाण्याचा पत्ताच नाही. या गावापैकी काही गावामध्ये बोअरवेलला पाणी लागले. मात्र केवळ दहा मिनिटे पाणी पुरत असल्यामुळे गावकऱ्यांची तहान भागणे शक्य होत नसल्याचे दिसते.
एक योजना पूर्ण न होता दुसऱ्या योजनेवर खर्च करण्याचे काम शासनाचे प्रतिनिधी करीत आहे. मात्र जुन्या योजनेचे काम पूर्ण का झाले नाही, याची चौकशी करण्याचे धाडस एकही अधिकारी करताना दिसत नाही.
पाईप लाईनही लिकेज
तालुक्यातील अनेक गावात पाईपलाईन लिक आहेत. त्याकडेसुद्धा संबंधित विभाग डोळेझाक करीत आहे. एकीकडे नागरिकांना पिण्यासाठी पाणी नाही तर दुसरीकडे पाईपलाईन लिक असल्यामुळे पाण्याचा अपव्यय होत आहे. अधिकाऱ्यांपुढे नागरिक समस्या सांगत ओरडतात. मात्र त्याचा काहीही उपयोग होताना दिसत नाही.
योजना नवीन पाईपलाईन जुनीच
दुर्गाडीपासून शिवापूरपर्यंत पाणी पोहचविण्यासाठी नवीन योजना अंमलात आणी आहे. या योजनेअगोदर जुन्या पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन पोहचली आहे. दुर्गाडीपासून शिवापूरपर्यंत पोहचली आहे. कंत्राटदारांकडून दुर्गाडीपासून शिवापूरपर्यंत पाणी नेण्यासाठी नवीन पाईपलाईनऐवजी जुन्याच पाईपलाईनचा वापर करण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे. कंत्राटदार शासनाकडून पाईपलाईनचे बिल काढणार नाही का? असा प्रश्न ग्रामस्थ करीत आहे.