नुपूर धमगाये हिने मारली बाजी
By Admin | Updated: May 31, 2017 00:55 IST2017-05-31T00:55:36+5:302017-05-31T00:55:36+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च-२०१७मध्ये घेतलेल्या इयत्ता १२वीच्या परीक्षेत जिल्ह्याचा निकाल ८८३२ टक्के लागला आहे.

नुपूर धमगाये हिने मारली बाजी
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च-२०१७मध्ये घेतलेल्या इयत्ता १२वीच्या परीक्षेत जिल्ह्याचा निकाल ८८३२ टक्के लागला आहे. त्यात मुलींनी वर्चस्व राखले आहे. स्थानिक जनता महाविद्यालयाची विद्यार्थिनी नुपूर महेंद्र धमगाये हिने ९४.४६ टक्के गुण मिळवून जिल्ह्यातून अव्वल स्थान प्राप्त केले आहे. तर तुकूम येथील मातोश्री विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी शुभम मारोती वराटकर याला ९४.३० टक्के गुण मिळाले आहेत. यावर्षी जिल्ह्यातून २९ हजार ७९० विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरला होता. त्यापैकी २९ हजार ७६७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातून २६ हजार २८९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामध्ये नोंदणी करणारे १५ हजार ३०५ विद्यार्थी आणि १४ हजार ४८५ विद्यार्थिनींनी होत्या. त्यापैकी १५ हजार २८७ मुले व १४ हजार ४८० मुलींनी परीक्षा दिली. निकालामध्ये १३ हजार १०६ विद्यार्थी व १३ हजार १८३ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांपेक्षा कमी मुलींनी परीक्षा दिली तरी उत्तीर्ण मुलींची संख्या अधिक आहे.
जिल्ह्यात तिसऱ्या क्रमांकावर पुन्हा मुलगीच आली आहे. ब्रह्मपुरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची तेजश्री नागदेवते हिने ९४.१५ टक्के गुण मिळविले आहेत. ती ब्रह्मपुरी तालुक्यातून अव्वल आली आहे. वरोरा तालुक्यातून आनंद निकेतन कनिष्ठ महाविद्यालयाचा तण्मय पापडे यानी सर्वाधिक ९२.१५ गुण पटकाविले आहेत. भद्रावती तालुक्यातून आदित्य बोंडगुलवार पहिला आला आहे. त्याने ९०.६२ टक्के गुण मिळविले आहेत. बल्लारपूर तालुक्यातून तृप्ती नागपुरे हिने सर्वाधिक ८५.७० टक्के गुण मिळविले आहेत.
नुपूरचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न
चंद्रपूर : १२ वीच्या निकालात चंद्रपूर जिल्ह्यातून प्रथम आलेल्या जनता महाविद्यालयातील नुपूर धमगाये हिला वैद्यकीय क्षेत्रात काम करायचे आहे. त्याकरिता तिने ‘नीट’ची तयारी केली आहे. तिला डॉक्टर बनून जनतेची सेवा करायची आहे. नुपूरची मोठी बहिण डॉ.आदिती धमगाये हीसुद्धा डॉक्टर असल्याने तिच्या पाऊल वाटेवर पाऊल टाकायचे आहे. नुपूरचे वडील महेंद्र धमगाये हे सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंता आहेत. तर आई माया धमगाये या प्राध्यापिका आहेत. नुपूरने नियोजन करुन दररोज पाच ते सहा तास सातत्याने अभ्यास केला. नुपूरच्या आईने तिला अभ्यासात मदत केली. नुपूरचे आदर्श डॉ.बाबासाहेब आंबेडकर आहेत. नुपूरला अवांतर वाचनाचा छंद असून अनेक थोर नेत्यांचे आत्मचरित्र तसेच कांदबरी वाचन करायला आवडते. त्याचबरोबर ती फावल्या वेळात टीव्हीवरील कार्यक्रम पाहात असते. नुपूरने विद्यार्थ्यांना संदेश देताना सांगितले की, नियमित व नियोजनबद्ध अभ्यास केल्याने कोणतीही परीक्षा यशस्वी करता येते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नियमित व सातत्याने अभ्यास करावा, असे तिने सांगितले.
वाणिज्यमध्ये सलेहा व कलामध्ये अक्षय आघाडीवर
जिल्ह्यामध्ये वाणिज्य शाखेचा निकाल ८८.०१ टक्के लागला आहे. त्यामध्ये जिल्ह्यात चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यालयाची सलेहा आरिफ शेख हिने ८९.८४ टक्के गुण घेऊन अव्वल स्थान पटकाविले आहे. तसचे कला शाखेचा निकाल ८२.६६ टक्के आहे. या शाखेत जनता महाविद्यालयाचा अक्षय दिनकर अलोणे याने ८८.७६ टक्के गुण प्राप्त केले आहेत. या शाखेत ब्रह्मपुरी येथील लोकमान्य टिळक कनिष्ठ महाविद्यालयाची शिल्पा दुपारे हिने ८६ .९२ टक्के गुण प्राप्त केले आहेत.
राजुरा तालुक्याचा सर्वाधिक
९१.९४ टक्के निकाल
जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये राजुरा तालुक्याचा सर्वाधिक ९१.९४ टक्के निकाल लागला आहे. २ हजार १५८ विद्यार्थ्यांपैकी १ हजार ९८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सर्वात कमी निकाल पोंभुर्णा तालुक्याचा आहे. तेथे ८१.०७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्या तुलनेत जिवती, कोरपना या आदिवासी बहुल तालुक्यांचा निकाल सरस ठरला आहे. ब्रह्मपुरीचा निकालही समाधान करण्यासारखा नाही. या तालुक्यात ८२.८० टक्के निकाल आहे.
पुनर्परीक्षेचा निकाल ४४.०७ टक्के
बारावीमध्ये जिल्ह्यात पुनर्परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याचा निकाल ४४.०७ टक्के लागला आहे. त्यामध्ये विज्ञान शाखेचा सर्वाधिक ६६.८९ टक्के, वाणिज्य ४३?६६, कला ३८.३६ आणि व्होकेशनल शाखेचा निकाल २८.४२ टक्के लागला आहे. १ हजार ४०९ विद्यार्थ्यानी पुन्हा परीक्षा दिल्यावर ६२१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.