कोर्टातील खटल्यांची संख्या कमी असावी
By Admin | Updated: January 19, 2016 00:45 IST2016-01-19T00:45:38+5:302016-01-19T00:45:38+5:30
सुदृढ समाजासाठी सामान्य लोकांच्या कोर्टातील खटल्यांची संख्या कमीत कमी असावी. तरच सामाजिक वातावरण चांगले राहील.

कोर्टातील खटल्यांची संख्या कमी असावी
एम.व्ही. कुळकर्णी : कायदेविषयक माहितीपर शिबिर
चंद्रपूर : सुदृढ समाजासाठी सामान्य लोकांच्या कोर्टातील खटल्यांची संख्या कमीत कमी असावी. तरच सामाजिक वातावरण चांगले राहील. कोणत्याही देशात कोर्टातील खटल्यांची संख्या जास्त असणे सामाजिकदृष्ट्या चांगले नाही, असे मत मुख्य दंडाधिकारी ए.व्ही. कुळकर्णी यांनी व्यक्त केले.
सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जे.ए. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वाणिज्य विभागाच्या वतीने आयोजित कायदेविषयक माहितीपर शिबीरामध्ये ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने मुख्य न्याय दंडाधिकारी ए.व्ही. कुळकर्णी, अतिरिक्त सहदिवाणी न्यायाधिश जे.व्ही. गांधे, अधिवक्ता एम.बी. आसरट, महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.आर.पी. इंगोले आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना ए.व्ही. कुळकर्णी यांनी समाजातील लोकांचे मन जर सुसंस्कृत असेल आणि प्रत्येकांनी इतरांशी चांगले वागण्याचा प्रयत्न केला तर कोर्टापर्यंत जाण्याचा प्रश्नच येणार नाही आणि समाज चांगल्या दिशेने वाटचाल करेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
प्रास्ताविकातून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.आर.पी. इंगोले यांनी या कायदेविषयक माहिती शिबिरातून विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनामध्ये सर्वसामान्य कायद्याची माहिती असावी. यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे स्पष्ट केले.या कार्यक्रमाच्या अनुषंगाने अधिवक्ता एम.बी. आसरट यांनी बाल न्याय कायदा या विषयावर माहिती विद्यार्थ्यांना दिली. संचालन प्राध्यापिका स्नेहल जाचक यांनी तर आभार प्राध्यापिका माधुरी राखुंडे-पिसे यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)