आता शिक्षकांची कागदोपत्री कामापासून होणार सुटका
By Admin | Updated: June 26, 2015 01:20 IST2015-06-26T01:20:11+5:302015-06-26T01:20:11+5:30
शैक्षणिक गुणवत्ता सुधार कार्यक्रम राज्यभरात चालू सत्रापासून राबविण्यात येणार आहे.

आता शिक्षकांची कागदोपत्री कामापासून होणार सुटका
चंद्रपूर : शैक्षणिक गुणवत्ता सुधार कार्यक्रम राज्यभरात चालू सत्रापासून राबविण्यात येणार आहे. यासह शासकीय शाळा गुणवत्तेत माघारण्याची कारणेही शोधली जाऊन उपाययोजना केल्या जाणार आहेत. शिक्षकांच्या मागे असलेली अशैक्षणिक कामे व अध्यापनाऐवजी वाढत असलेल्या कागदी कामाचा व्याप, यासह केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी यांच्यासारखे प्रशासकीय घटक गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांना मार्गदर्शन करण्याऐवजी कागदोपत्री माहितीला देत असलेले प्राधान्य ही गुणवत्ता माघारण्यासाठी एक कारण नक्कीच आहे. त्यामुळे या सत्रापासून शिक्षक व प्रशासकीय घटकांची कागदोपत्री माहितीच्या कामातून सुटका करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे शिक्षण संचालक महावीर माने यांनी दिली आहे. यामुळे शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेद्वारा आयोजित राज्यस्तरीय गुणवत्ता विकास कार्यशाळेत महावीर माने यांनी ही माहिती दिली. या कार्यशाळेला चंद्रपूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी राज्याध्यक्ष प्रसाद पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून आर.जी. भानारकर, विनायक घटे, शंकर पाटील, मारोती सावंत, विजय भोगेकर, अशोक पाटील, दीपक वऱ्हेकर, राजेश दरेकर उपस्थित होते. यापुढे शाळा सुरुवातीच्या पहिल्या महिन्यात संपूर्ण शाळा, विद्यार्थी व शिक्षकांची माहिती वर्षभरात फक्त एकदाच मागण्यात येईल. शिक्षकांनी या विचाराचे सकारात्मक स्वागत केले आहे. शिक्षक या अध्यापनाऐवजी असलेल्या कागदोपत्री कामाने त्रस्त झाले होते. त्यांचा अध्यापनाचा बराचसा वेळ या कामात वाया जात होता. राज्याचे प्रमुख अधिकारी यांनी याप्रमाणे सकारात्मक विचार करून गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करीत असल्याचे पाहून शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असल्याबाबत यावेळी जिल्ह्यातील शिक्षक हरीश ससनकर, अल्का ठाकरे यांचे शिक्षक संचालक महावीर माने यांच्याकडून कौतुकही करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील मागील सत्रापासून सुरू असलेले शैक्षणिक नवोपक्रम व गुणवत्ता विकासासाठी शिक्षकांचा पुढाकार, यावर हरीश ससनकर यांनी विचार व्यक्त केले. अल्का ठाकरे यांनी शिक्षकांच्या पुढाकारातून व एकजुटीतून गुणवत्तेकडे झेप घेत असलेल्या जिल्ह्यातील शाळांची या कार्यशाळेत उपस्थितांना माहिती दिली. (शहर प्रतिनिधी)