दहावीचा निकाल लागूनही विद्यार्थ्यांची ना धडपड ना धावपळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:23 IST2021-07-17T04:23:04+5:302021-07-17T04:23:04+5:30

चंद्रपूर : कोरोना संकटामुळे राज्य माध्यमिक व उच माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा परीक्षा न घेता अंतर्गत मूल्यमापन ...

No rush or rush of students despite the result of 10th! | दहावीचा निकाल लागूनही विद्यार्थ्यांची ना धडपड ना धावपळ!

दहावीचा निकाल लागूनही विद्यार्थ्यांची ना धडपड ना धावपळ!

चंद्रपूर : कोरोना संकटामुळे राज्य माध्यमिक व उच माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा परीक्षा न घेता अंतर्गत मूल्यमापन करून शुक्रवारी दुपारी एक वाजता इयत्ता दहावीचा निकाल ऑनलाईन जाहीर केला. मात्र, शिक्षण मंडळाचे संकेतस्थळच क्रॅश झाल्याने हजारो विद्यार्थ्यांना निकाल पाहता आला नाही. विशेष म्हणजे, परीक्षाविना जाहीर झालेल्या या निकालाने विद्यार्थ्यांची ना धडपड वाढविली ना धावपळ दिसून आली, असे एकंदर जिल्ह्यातील चित्र होते. जिल्ह्याचा निकाल ९९.१० टक्के लागला. ३० हजार १२५ पैकी २९ हजार ८४५ उत्तीर्ण झाले, तर केवळ २८० विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.

कोरोना महामारीने गेल्या शैक्षणिक सत्रापासून विद्यार्थ्यांचे नुकसान झाले होते. यंदाच्या सत्रात तरी परीक्षा होतील, असे वाटत असतानाच कोरोनाची दुसरी लाट आली आणि शाळांना पुन्हा कुलूप लागले. त्यामुळे प्रचलित परीक्षा पद्धतीला टाळून अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे दहावीच्या विद्यार्थ्यांना पुढील ११ व्या वर्गात वर्गोन्नती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील ६१६ शाळांमधून ३० हजार १२५ विद्यार्थ्यांची यंदाच्या दहावीत नोंदणी झाली. त्यापैकी २९ हजार ८४५ विद्यार्थी अंतर्गत मूल्यमापनानुसार उत्तीर्ण झाले, तर केवळ २८० विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. यदा परीक्षाच न झाल्याने विद्यार्थ्यांनी पास होणारच या मानसिकतेमुळे ऑनलाईन निकाल पाहण्याचीही तसदी घेतली नाही.

बॉक्स

नागपूर विभागातून चंद्रपूर जिल्हा सहावा

नागपूर विभागात भंडारा, नागपूर, वर्धा, गडचिरोली, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यांचा समावेश होतो. दहावीच्या परीक्षेत गोंदियाचा सर्वाधिक ९९. ६१, तर सर्वांत कमी चंद्रपूर जिल्ह्याचा ९९. १० टक्के निकाल लागला आहे.

बॉक्स

तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांचा हिरमोड

दहावीचा ऑनलाईन निकाल पाहण्यासाठी राज्य माध्यमिक व उच माध्यमिक शिक्षण मंडळाने संकेतस्थळ दिले. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे हे संकेतस्थळच उघडले नाही. त्यामुळे अनेक हुशार विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला. तालुकानिहाय निकाल आणि जिल्ह्यातून सर्वाधिक गुण प्राप्त करून उत्तीर्ण होणारे गुणवंत विद्यार्थी कोण, याची माहितीच मिळू शकली नाही.

बॉक्स

विद्यार्थ्यांचे असे झाले मूल्यांकन

कोरोनामुळे राज्य माध्यमिक व उच माध्यमिक शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनासाठी नवे निकष तयार केले होते. दहावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापनासाठी ३० गुण, दहावीचे गृहपाठ, तोंडी परीक्षा व प्रात्याक्षिक परीक्षेच्या आधारे अंतर्गत मूल्यमापनाला २० गुण आणि विद्यार्थ्यांच्या नववीच्या विषयनिहाय अंतिम निकालानुसार ५० गुण असे निकष निश्चित केले. यानुसारच निकाल जाहीर झाला आहे.

बॉक्स

विद्यार्थी समाधानी नसल्यास पुन्हा परीक्षा

विद्यार्थ्यांना हा निकाल समाधानकारक वाटला नाही तर कोरोनाची परिस्थिती सामान्य झाल्यानंतर प्रचलित पद्धतीनुसार श्रेणीसुधार योजनेंतर्गत यापुढील दोन परीक्षांमध्ये परीक्षेची संधी देण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या निकालाचे नियमन करण्यासाठी शालेयस्तरावर मुख्याध्यापकांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची निकाल समिती असेल. या निकालपत्रांच्या अभिलेखांची पडताळणी विभागीय स्तरावर शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून केली जाईल, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

निकालावर दृष्टिक्षेप

एकूण विद्यार्थी ३०,१२५

परीक्षेसाठी पात्र ३०,१२५

उत्तीर्ण २९,८४५

प्रावीण्य ५,६४५

प्रथम श्रेणी १४,०७०

द्वितीय श्रेणी ८,६७६

अनुत्तीर्ण ३८०

कोट -

राज्य माध्यमिक व उच माध्यमिक शिक्षण मंडळाने यादृष्टीने दहावीचा ऑनलाईन निकाल विद्यार्थ्यांना पाहता यावा, यासाठी जाहीर केला. याबाबतची माहिती शिक्षण विभाग व शाळांना दिली नाही. तांत्रिक अडचणींमुळे संकेतस्थळ बंद झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता आला नाही, हे खरे आहे. मात्र, काही दिवसांतच निकाल शाळांमध्ये उपलब्ध होणार आहे.

-उल्हास नरड, शिक्षणाधिकारी (माध्य.) जि. प. चंद्रपूर

Web Title: No rush or rush of students despite the result of 10th!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.