शिक्षणाच्या खासगीकरणाने आणला नवा जातीवाद
By Admin | Updated: December 23, 2014 23:01 IST2014-12-23T23:01:19+5:302014-12-23T23:01:19+5:30
सरकारने शिक्षणाच्या खासगीकरण आणि बाजारीकरणास प्रोत्साहन दिले. त्यामुळे विनाअनुदानित खासगी शाळांना पेव फुटले. शिक्षण सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेले असल्याने शिक्षणाने

शिक्षणाच्या खासगीकरणाने आणला नवा जातीवाद
चंद्रपूर : सरकारने शिक्षणाच्या खासगीकरण आणि बाजारीकरणास प्रोत्साहन दिले. त्यामुळे विनाअनुदानित खासगी शाळांना पेव फुटले. शिक्षण सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेले असल्याने शिक्षणाने नवा वाद निर्माण केला आहे, असे मत अखिल भारतीय शिक्षण संघर्ष यात्रेचे संयोजक रमेश बिजेकर यांनी केले.
चंद्रपुरातील एफईएस गर्ल्स कॉलेजमध्ये शिक्षण संघर्ष यात्रेच्या स्वागत समारंभात ते बोलत होते. अखिल भारतीय शिक्षण हक्क परिषदेने देशभरात चार संघर्ष यात्रा काढल्या आहेत. रमेश बिजेकर आंध्र- तेलंगणामधील आदिलाबाद जिल्ह्यातून चंद्रपुरात आलेल्या यात्रेचे संयोजक म्हणून चंद्रपुरात संघर्ष यात्रा घेवून आले असता, अखिल भारतीय सत्यशोधक समाज जिल्हा चंद्रपूरच्या वतीने यात्रेच्या स्वागताचा कार्यक्रम आयोजित केला होता.
या यात्रेचे चंद्रपूर महानगराच्या सीमेवर माजी आमदार एकनाथराव साळवे, हिराचंद बोरकुटे, प्रा. माधव गुरनुले, अरुण धानोरकर, किशोर पोतनवार, प्रा.एस.टी. चिकटे यांनी स्वागत केले. यात्रा एफ.ई.एस. गर्ल्स कॉलेजमध्ये पोहचताच अॅड.एकनाथ साळवे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभात त्यांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक किशोर पोतनवार यांनी केले. संचालन प्रा. माधव गुरनुले तर अभार धानोरकर यांनी मानले. (नगर प्रतिनिधी)