चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य कृषी क्षेत्रात अग्रेसर रहावे, यासाठी राज्य शासनाच्या ऊर्जा विभागाने कृषीपंप वीज ग्राहकाला त्याच्या मागणीनुसार वीज जोडणीसाठी नवीन कृषीपंप वीज जोडणी धोरण-२०२० जाहीर केले आहे. या धोरणानुसार कृषी पंपाच्या वीज बिलात सवलत देण्यात येत असून, सुधारित थकबाकीच्या ५० टक्के रकम भरल्यास उर्वरित रक्कम माफ करण्यात येणार आहे. हे धोरण बळीराजाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे असून, शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन वीज वितरण विभागाच्या अधीक्षक अभियंता संध्या चिवंडे यांनी केले आहे.
या धोरणातील ठळक वैशिष्ट्यानुसार ३० मीटरच्या आत सर्व कृषी पंप ग्राहकांना तत्काळ वीज कनेक्शन देण्यात येणार आहे. ज्या कृषीपंप अर्जदाराचे अंतर लघुदाब वाहिनीपासून २०० मीटर आत आहे, अशा नवीन कृषी पंप ग्राहकांना एरियल बंच केबलद्वारे ३ महिन्यात नवीन वीज जोडणी देण्यात येईल. २०० ते ६०० मीटर आत असलेल्या ग्राहकांना उच्चदाब वितरण प्रणालीचा पर्याय उपलब्ध असून, विशिष्ट परिस्थितीत ६०० मीटरपेक्षा जास्त अंतर असलेल्या कृषी ग्राहकांना सौरऊर्जा अथवा उच्चदाबावर वितरण प्रणालीचा पर्याय उपलब्ध असेल.
बाॅक्स
ग्रामपंचायत स्तरावर नवीन कृषीपंप वीज जोडणी, वितरण रोहित्रांची क्षमता वाढ, नवीन वितरण रोहित्र बसविणे, लघुदाब वाहिनीचे व ११ के. व्ही.२२ के.व्ही. वाहिनीचे बळकटीकरणाची कामे करण्यात येणार आहेत. जिल्हा स्तरावर उपकेंद्रामध्ये स्टेशन टाइप व कॅपॅसीटर बसवणे तसेच खराब झालेले कॅपॅसीटर बदलणे, उपकेंद्रामधील अर्थिग बसविणे, उच्चदाब लिंक लाइन उभारणे आदी कामे व उपकेंद्रामधील देखभाल व दुरुस्तीची कामे करण्यात येणार असल्याचे अधीक्षक अभियंता संध्या चिवंडे यांनी म्हटले आहे.