बाबासाहेबांच्या विचारांसाठी लढा उभारण्याची गरज
By Admin | Updated: January 31, 2015 23:17 IST2015-01-31T23:17:51+5:302015-01-31T23:17:51+5:30
गेल्या ६५ वर्षांपासून बाबासाहेब आंबेडकरांची राजकीय, सामाजिक चळवळ थोपविण्याचे षडयंत्र रचले जात आहे. सिंहासारखी डरकाळी फोडणाऱ्या लढवय्या घराण्यात ज्यांचा जन्म झाला,

बाबासाहेबांच्या विचारांसाठी लढा उभारण्याची गरज
चंद्रपूर : गेल्या ६५ वर्षांपासून बाबासाहेब आंबेडकरांची राजकीय, सामाजिक चळवळ थोपविण्याचे षडयंत्र रचले जात आहे. सिंहासारखी डरकाळी फोडणाऱ्या लढवय्या घराण्यात ज्यांचा जन्म झाला, शोषित, पिडीत जनतेला मानवमुक्ती देवून संपूर्ण विश्वात प्रस्थापितांनी समाजात निर्माण केलेली विषमता दूर करण्यासाठी अहोरात्र झटणारे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार विश्वात पोहचविण्यासाठी लढा उभारण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन बाबासाहेबांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी व्यक्त केले.
ते बुद्धीस्ट समन्वय कृती समितीद्वारा आयोजित दोन दिवसीय धम्म परिषदेच्या ‘फुले, शाहु, आंबेडकर यांच्या विचाराशिवाय देशाला तरणोपाय नाही’ या विषयावरील प्रबोधन सत्राच्या अध्यक्ष स्थानावरुन बोलत होते.
बुद्धीस्ट समन्वय कृती समितीच्या वतीने दोन दिवसीय बौद्ध धम्म परिषद आणि उपवर-वधू परिचय मेळावा पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून कार्यकारी अभियंता अर्चना घोडेस्वार चंद्रपूर, भिमराव जुनघरे आलापल्ली, प्रकाश गावंडे, विलासराव बनकर, विद्याधर लाडे, अॅड. अवधुत मांगे उपस्थित होते. प्रमुख अतिथी अर्चना घोडेस्वार यांनी फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचाराशिवाय देशाला तरणोपाय नसल्याचे स्पष्ट करून आपण वेळ, पैसा आणि बुद्धी खर्ची घालून नवसमाज घडविण्याचे कार्य करण्याच्या आवश्यकतेवर भर दिला. प्रास्ताविक वंदना जांभुळकर, संचालन अजय गणवीर व आभार राहूल देशपांडे यांनी मानले. यावेळी हजारो बौद्ध बांधव उपस्थित होते. (प्रतिनिधी)