राष्ट्रीय महामार्ग ठरला डोकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 23:05 IST2018-07-10T23:04:48+5:302018-07-10T23:05:10+5:30
उमरेड - चिमूर - वरोरा या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. क्रांतीनगरी चिमूरपासून वरोरा हा मार्ग पूर्णपणे खोदण्यात आला आहे व वाहनांच्या वाहतुकीस पर्यायी रस्ता तयार करण्यात आला. मात्र हा समस्याग्रस्त पर्यायी मार्गच वाहनचालकांची डोकेदुखी ठरत आहे.

राष्ट्रीय महामार्ग ठरला डोकेदुखी
लोकमत न्यूज नेटवर्क
खडसंगी : उमरेड - चिमूर - वरोरा या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. क्रांतीनगरी चिमूरपासून वरोरा हा मार्ग पूर्णपणे खोदण्यात आला आहे व वाहनांच्या वाहतुकीस पर्यायी रस्ता तयार करण्यात आला. मात्र हा समस्याग्रस्त पर्यायी मार्गच वाहनचालकांची डोकेदुखी ठरत आहे.
उन्हाळ्याच्या काळात मार्गावरून सर्वत्र उडण्याऱ्या धुराची समस्या होती. आता पावसाळ्यात चिखलामुळे वाहनचालकांना वाट शोधणेच कठीण झालेले आहे.
महामार्गाच्या एका बाजूस गिट्टी पसरवली आहे. मात्र त्यावर प्रेसिंग करण्यात आलेली नाही. परिणामी ती गिट्टी सर्वत्र विखुरली आहे. तर दुसरी बाजू वाहनांसाठी चालू आहे. या पर्यायी मार्गाच्या तुलनेत काम सुरू असलेला मार्ग खूपच उंच आहे. थोडासाही पाऊस आला तर पर्यायी मार्गावर पाणी साचते व या पाण्याचा निचरा होत नाही.
यामुळे रस्त्यावर चिखल निर्माण होत आहे. आणि या चिखलातून वाट काढणे वाहन चालकांसाठी कठीण ठरत आहे.
दुचाकीने प्रवास करणे तर कसरत केल्यासारखेच झाले आहे. प्रवासादरम्यान चारचाकी वाहन बाजूने गेले तर साचलेले सर्व चिखलाच पाणी दुचाकी चालकांच्या अंगावर उडत असते. अशा चिखलयुक्त मार्गावर वाहन स्लिप होणे, रस्त्यावर टाकलेल्या गिट्टीमुळे वाहनांचे टायर पंक्चर होणे, असे प्रकार दररोज घडत आहेत. याच बाजूने प्रवास करताना सावध प्रवास करावा लागत आहे.
जर बाजूने मोठे वाहन वेगाने गेल्यास पसरलेली गिट्टी उसळून लागण्याची शक्यता दाट शक्यता आहे. अशावेळी वाहनचालक गंभीर जखमी होऊ शकतो. यासारख्या अनेक समस्या या मार्गावर उद्भवत आहेत. अलिकडच्या काळात बेंबाळ गावाजवळ पावसामुळे चक्क रस्ता वाहून गेला.
परिणामी एक दिवस पूर्ण महामार्गाच बंद करण्यात आला होता. या महामार्गाच्या चौपदरीकरणाची गती अतिशय मंद स्वरूपाची आहे. त्यामुळे आणखी किती काळ असा त्रास वाहन चालकांना सहन करावा लागेल हे सांगणे कठीण आहे.
विशेष म्हणजे, याच मार्गावरून मोठ्या प्रमाणात जडवाहनांचीही वाहतूक होते. या मार्गावर वाहने रस्त्यात साचलेल्या चिखलामुळे अडकल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामुळे पर्यायी मार्ग दुरुस्त करण्याची मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.