नलफडीची जि.प. शाळा झाली ‘ज्ञानगंगा एक्स्प्रेस’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 05:00 AM2020-08-07T05:00:00+5:302020-08-07T05:01:07+5:30
इतर शाळेप्रमाणे आपली शाळाही सुंदर दिसावी, या उद्दात हेतूने येथील शिक्षक रामरतन चाफले यांच्या पुढाकारातून त्यांनी स्वखर्चातून एका वर्गखोलीची रंगरंगोटी केली. त्यानंतर शाळेची मुख्य समस्या विचारात घेऊन गावातील ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती व पालकांची सभा घेऊन शाळेतील समस्या मार्गी लावण्याचे ठरले.
प्रकाश काळे।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी : मनात जिद्द आणि प्रचंड आत्मविश्वास असेल तर कोणतेच काम अडचणीचे ठरत नाही. त्यात चांगले काम करण्यासाठी लोकसहभाग असला तर ते काम अधिकच सुखकर होते. राजुरा तालुक्यातील नलफडी येथील जि.प. उच्च. प्राथ.शाळेची अतिशय देखणी रंगरंगोटी आकर्षणाचा केंद्रबिंदू झाला असून या शाळेच्या बोलक्या भिंतींमुळे ही शाळा आता ‘ज्ञानगंगा एक्स्प्रेस’ झाली आहे.
नलफडी येथील जि.प.उच्च.प्राथ.शाळेत १ ते७ वर्ग आहेत. राजुरा तालुका स्थळापासून अतिशय दुर्गम भागात असलेले तसे हे दुर्लक्षित गाव. मात्र आपली मुले शिकून मोठी झाली पाहिजे, असे येथील शिक्षक आणि गावकऱ्यांना मनोमय वाटत होते. त्यासाठी शिक्षणासोबतच शाळेची इमारत व शैक्षणिक वातावरण तेवढेच चांगले असावे लागते.
इतर शाळेप्रमाणे आपली शाळाही सुंदर दिसावी, या उद्दात हेतूने येथील शिक्षक रामरतन चाफले यांच्या पुढाकारातून त्यांनी स्वखर्चातून एका वर्गखोलीची रंगरंगोटी केली. त्यानंतर शाळेची मुख्य समस्या विचारात घेऊन गावातील ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती व पालकांची सभा घेऊन शाळेतील समस्या मार्गी लावण्याचे ठरले.
त्यानंतर शाळेच्या इमारतीला लोकसहभागातून रंगरंगोटी करण्यात आली. यासाठी संवर्ग विकास अधिकारी ओमप्रकाश रामावत यांची मोलाची मदत लाभली. शाळेच्या संरक्षण भिंतीवर रेल्वेचे डब्बे साकारत अतिशय देखणी रंगरंगोटी व सुविचार लिहून शाळेच्या भिंती बोलक्या करण्यात आल्या. येथील मुख्याध्यापक सुरेश उमरे, शिक्षक रामरतन चाफले, राकेश नंदूरकर, जयबुध्द राऊत, सरपंच अर्चना धानोरकर, उपसरपंच विनोद धोटे, शा.व्य.स.अध्यक्ष मंगला टेकाम, शौकत शेख, भास्कर धोटे, दिलीप टेकाम, मनोहर चांदेकर, विलास निंदेकर यांच्या व गावकऱ्यांच्या लोकसहभागातून नलफडी येथील जि.प.उच्च.प्राथमिक शाळेचा कायापालट झाला आहे. यामुळे दुर्गम भागातील ही शाळा आता आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली आहे.
पाण्याची समस्या निकाली काढली
नलफडी येथील शाळेच्या आवारात नेहमी पावसाचे पाणी साचून राहत असल्याने शाळेला तलावाचे स्वरूप यायचे. विद्यार्थ्यांना व शिक्षकांना शाळेत येण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली होती. मात्र गावकºयांच्या लोकसहभागातून जवळपास दीड लाख लोकवर्गणी गोळा करून शाळेच्या आवारात १२० ट्रॅक्टर माती व मुरूम टाकून पाण्याची समस्या निकाली काढली.
शिक्षण विभागातील अधिकारी, शाळेचे सर्व शिक्षक व गावकºयांच्या लोकसहभागातून नलफडी येथील जि.प. उच्च.प्राथ. शाळेचा संपूर्ण कायापालट झालेला आहे. येथील शाळेच्या सर्व भिंतीवर रंगरंगोटी करून भिंतीवर विविध सुविचार लिहून भिंती बोलक्या करण्यात आल्या.
- सुरेश उमरे, मुख्याध्यापक, जि.प. उच्च.प्राथ.शाळा, नलफडी.