नागभीड नगरपरिषदने केले रोहयोचे काम बंद
By Admin | Updated: April 24, 2016 01:11 IST2016-04-24T01:11:21+5:302016-04-24T01:11:21+5:30
नागभीड नगर परिषद होताच रोजगार हमी योजनेचे काम बंद करण्यात आल्याने संबंधित मजुरांवर उपासमारीची पाळी ओढवली आहे.

नागभीड नगरपरिषदने केले रोहयोचे काम बंद
हाताला काम नाही : मजुरांची भटकंती
चिखलपरसोडी : नागभीड नगर परिषद होताच रोजगार हमी योजनेचे काम बंद करण्यात आल्याने संबंधित मजुरांवर उपासमारीची पाळी ओढवली आहे. त्यामुळे या भागातील मजुरांना कामाच्या शोधात भटकावे लागत असल्याचे चित्र चिखलपरसोडी या गावात पहायला मिळत आहे.
नागभीडपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या चिखलपरसोडी गावाचा नगरपरिषदेमध्ये समावेश झाला. त्यापूर्वी रोहयोचे काम सुरू झाल्याने मजूरवर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण होऊन मजूर कामावर जाऊ लागले. कामाला उणेपुरे २४ दिवस झाले न झाले तोच ११ एप्रिलला नागभीड नगरपरिषदेची घोषणा झाली आणि रोहयोचे काम ठप्प झाले.
नागभीड नगर परिषद होण्यासाठी चिखल परसोडी ग्रामपंचायतीचा मोलाचा वाटा आहे. परंतु येथील भोळ्या जनतेला आपण रोहयोच्या कामापासून वंचित होऊ, याची यत्किंचीतही कल्पना नव्हती. रोजगार सेवकाने १२ एप्रिलपासून काम बंद झाल्याचे समजतात धक्का बसला. त्यामुळे मजूर वर्गामध्ये कमालिची अस्वथता जाणवत होती. आता कोणते काम करावे, असा प्रश्न मजुरांपुढे उभा ठाकला आहे.
नगरपरिषदेच्या माध्यमातून एकीकडे गावाचा विकास साधता येईल. परंतु सद्यस्थितीत मजूर वर्गाचा दोनवेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. हा मजूर वर्ग सध्या कामासाठी इतरत्र भटकत असल्याचे चित्र आहे. (वार्ताहर)