मनपा कर्मचाऱ्यांचा संप अटळ
By Admin | Updated: December 13, 2015 00:40 IST2015-12-13T00:40:38+5:302015-12-13T00:40:38+5:30
मागील अनेक महिन्यांपासून मनपा आयुक्त आणि मनपा कर्मचाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव दिसून येत आहे. मनपा कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे आयुक्त...

मनपा कर्मचाऱ्यांचा संप अटळ
वर्षभरापासून संघर्ष : विविध मागण्यांची पूर्तता करण्याची मागणी
चंद्रपूर : मागील अनेक महिन्यांपासून मनपा आयुक्त आणि मनपा कर्मचाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव दिसून येत आहे. मनपा कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे आयुक्त सातत्याने दुर्लक्ष करीत आहेत. मागण्यांबाबत चर्चा करायलाही आयुक्त तयार नाहीत. त्यामुळे आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी मनपा कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप आता अटळ आहे.
चंद्रपूर शहर महानगरपाालिकेतील कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्याबाबत मागील एक वर्षापासून संघटनेकडून सातत्याने मनपा प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. मनपा प्रशासनाच्या हेकेखोर धोरणामुळे कर्मचाऱ्यांच्या १४ मागण्यांपैकी एकही मागणीची प्रशासनाकडून पुर्तता करण्यात आलेली नाही. त्यामुळे भारतीय नगरपरिषद कामगार संघाच्या नेतृत्वात १४ नोव्हेंबर २०१५ पासून मनपा कर्मचाऱ्यांनी असहकार आंदोलन सुरू केलेले होते व त्याबाबत मनपा प्रशासनाला कळविलेसुद्धा होते. त्यानंतरही आयुक्तांनी मनपा कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिले नाही. किंवा या संदर्भात साधी चर्चा करण्याचे सौजन्यही दाखविले नाही.
दरम्यान, ३० नोव्हेंबर २०१५ ला संघटनेने मनपा प्रशासनाला रितसर बेमुदत संपाची नोटीस बजावण्यात आली व त्यामध्ये ११ डिसेंबर २०१५ पर्यंत कर्मचाऱ्यांचा मागण्याची पुर्तता न झाल्यास १४ डिसेंबर २०१५ ला शुन्य तासापासून संपूर्ण कर्मचारी बेमुदत संपावर जाणार, असे मनपा प्रशासनाला सूचित करण्यात आलेले होते.
११ डिसेंबर २०१५ पर्यंत मनपा प्रशासनाकडून कोणतीही मागणीची पुर्तता न झाल्यामुळे त्याच दिवशी भारतीय मजदुर संघाचे अध्यक्ष अॅड. शैलेश मुंजे, महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सतिश असरेट यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी ६ वाजता द्वारसभा घेण्यात आली. सदर द्वारसभेत कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्यांची सविस्तर माहिती उपस्थितीत सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात आली. सदर द्वारसभेत कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्यांची सविस्तर माहिती उपस्थितीत सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात आली. सदर संपात सतिश असरेट यांनी पाठिंबा दर्शवून सर्व सफाई कामगारांना संपात सहभागी होण्याचे आवाहन केले.
वारंवार निवेदन देऊनही मनपा प्रशासनाकडून कोणत्याच सकारात्मक हालचाली होत नसल्याने आता मनपा कर्मचाऱ्यांनी आंदोलन तिव्र करण्याची पूर्ण तयारी केली आहे. १४ डिसेंबरपासून बेमुदत संपाला सुरुवात होणार, हे अटळ असल्याचे मनपा वर्तुळात बोलले जात आहे.
मनपातील सर्व कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी होवून प्रशासनाकडून मागण्या मान्य होतपर्यंत एकजुटीचा परिचय करून संप यशस्वी करावा, अशी विनंती आवाहन भारतीय मजदूर संघाचे जिल्हाध्यक्ष अॅड. शैलेश मुंजे, सुरेश आंबेकर, तुकड्यादास डुमरे, सारंग निर्मळे, संजय टिकले, सचिन माकोडे, वासंती बहाद्दुरे, विवेक पोतनुरवार, भुपेश गोठे, प्रदीप मडावी, संतोष गर्गेलवार, मनोज सोनकुसरे, महेंद्र हजारे, उदय मैलारपवार, अनिरूद्ध राजुरकर, मधुकर चिवंडे, मधु श्रीरामे आदींनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)