थकीत करधारकांवर मनपा उगारणार बडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 06:00 IST2020-02-05T06:00:00+5:302020-02-05T06:00:35+5:30
शहरातील थकबाकीदारांची यादीनुसार वसुली करण्याला मनपाने प्राधान्य दिले आहे. करातुन येणारे उत्पन्न हे महानगर पालिकेच्या उत्पनाचे मुख्य स्रोत आहे. त्यावरच आर्थिक बाजू अवलंबून असल्याने कर वसुली होणे आवश्यक आहे. थकबाकीदारांना मनपातर्फे याबाबत वेळोवेळी सूचना दिल्या आहेत. सन २०१९ - २० या आर्थिक वर्षात कर वसुलीसाठी मनपाने थकबाकीदारांची यादी तयार केली आहे.

थकीत करधारकांवर मनपा उगारणार बडगा
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मालमत्ता कर वसुलीचा वेग वाढविण्यासाठी थकबाकीदारांवर सक्त कारवाई करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त संजय काकडे दिले. दरम्यान झोननिहाय विशेष वसुली मोहीम राबविण्य बरोबरच थकबाकीदारांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी मनपा अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
शहरातील थकबाकीदारांची यादीनुसार वसुली करण्याला मनपाने प्राधान्य दिले आहे. करातुन येणारे उत्पन्न हे महानगर पालिकेच्या उत्पनाचे मुख्य स्रोत आहे. त्यावरच आर्थिक बाजू अवलंबून असल्याने कर वसुली होणे आवश्यक आहे. थकबाकीदारांना मनपातर्फे याबाबत वेळोवेळी सूचना दिल्या आहेत. सन २०१९ - २० या आर्थिक वर्षात कर वसुलीसाठी मनपाने थकबाकीदारांची यादी तयार केली आहे. याकरिता विशेष जप्ती पथक तयार करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी मनपाच्या झोननिहाय कार्यालयात जाऊन तात्काळ थकीत कराचा भरणा करावा अन्यथा जप्तीची कारवाई करण्याचा इशारा आयुक्त काकडे यांनी दिला आहे. सन २०१६ - १७ या आर्थिक वर्षात मनपा हद्दीतील कर मूल्यांकन करण्यात आले होते. या मूल्यांकनाबाबत नागरिकांच्या काही हरकती असल्यास झोननिहाय आक्षेप सादर कारण्याबाबत वर्तमानपत्रात सूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार काही नागरिकांनी कार्यालयात लेखी आक्षेप सादर केले. काहींनी आक्षेप सादर न करता उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात दाद मागितली. या संदर्भात उच्च न्यायालयाने ८ जानेवारी २०२० रोजी पारीत केलेल्या आदेशानुसार सदर याचिकेमधील समाविष्ट असलेल्या लोकांनच मालमत्ता करासंबंधी स्थगनादेश लागू आहे. मात्र, कोणत्याही प्रकारची कर माफी नाही, असेही आयुक्त काकडे यांनी सांगितले.
न्यायालयाचा आदेश केवळ ४७ जणांना लागू
मालमत्ता करासंबंधी उच्च न्यायालयाचे निर्देश हे केवळ याचिकाकर्ते व याचिकेमधील समाविष्ट इतर ४७ लोकांना लागू होते. सदर आदेशानुसार उच्च न्यायालयाने याचिकाकर्ता व याचिकेमधील समाविष्ट इतर ४७ नागरिकांच्या आक्षेपांवर निर्णय घेऊन त्यांना नव्याने देयके देण्याचे निर्देश दिले आहे. मात्र, याबाबत आक्षेपधारकांचे कर माफ झाल्याची खोटी माहिती देऊन नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यात आला आहे. मनपाने कुणाचाही कर माफ केला नाही, त्यामुळे नागरिकांनी खोट्या माहितीला बळी न पडता चालू वर्ष आणि थकीत कराचा भरणा तात्काळ मनपाच्या झोन निहाय कार्यालयात जमा करावा, असे आवाहन आयुक्त संजय काकडे यांनी केले आहे.