महानगरपालिकेत भाजपाने एकहाती सत्ता स्थापण्याचे ध्येय बाळगावे
By Admin | Updated: January 1, 2017 01:12 IST2017-01-01T01:12:21+5:302017-01-01T01:12:21+5:30
महानगरपालिकेवर एकहाती सत्ता प्रस्थापित करणे हे भाजपाचे लक्ष्य असून या ध्येयपूर्तीसाठी पक्षाच्या पदाधिकारी

महानगरपालिकेत भाजपाने एकहाती सत्ता स्थापण्याचे ध्येय बाळगावे
हंसराज अहीर : चंद्रपुरात पार पडला कार्यकर्ता मेळावा
चंद्रपूर : महानगरपालिकेवर एकहाती सत्ता प्रस्थापित करणे हे भाजपाचे लक्ष्य असून या ध्येयपूर्तीसाठी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वत:ला झोकून देत केंद्र व राज्य सरकारच्या लोकाभिमुख योजनांचा लाभ तळागाळातील लोकापर्यंत पोहचवावा. या दोन्ही सरकारच्या कार्यकाळातील तसेच भाजप नेतृत्वातील चंद्रपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून झालेला विकास जनतेपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी भाजप कार्यकर्ता मेळाव्यास संबोधित करताना केले.
दाताळा मार्गावरील जिजाऊ लॉन येथे शुक्रवारी पार पडलेल्या या मेळाव्यास राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष तथा आमदार नाना श्यामकुळे, भाजपा नेते विजय राऊत, महापौर राखी कंचर्लावार, वनिता कानडे, अनिल फुलझेले, राजेश मून, तुषार सोम, राजेंद्र अडपेवार, रामपाल सिंह, धनंजय हुड, मोहन चौधरी, सुभाष कासनगोट्टूवार, संतोष वडपल्लीवार, ब्रिजभूषण पाझारे, राहूल पावडे, रमेश भूते, संदीप आगलावे, श्याम कनकम, विठ्ठल डुकरे, निलेश बेडेकर, सुनील डोंगरे, रवि जोगी, अंजली घोटेकर आदींची उपस्थिती होती.
ना. हंसराज अहीर पुढे म्हणाले, आज केंद्र व राज्यात असलेले भाजप नेतृत्वातील सरकार हे कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचे व पक्षाच्या सामाजिक कार्याचे फलीत असल्याचे सांगत सरकारच्या लोकाभिमुख, विकासाभिमुख, जलद कार्यामुळे आज देशामध्ये प्रथम क्रमांकाचा राजकीय पक्ष म्हणून भाजप ताठ मानेने उभा आहे. गेल्या ५० वर्षात ज्या योजना विरोधकांना राबविता आल्या नाही व या योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहचविण्यात विरोधक यशस्वी ठरले नाही. त्या योजना अवघ्या अडीच वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू करून त्या सक्षमपणे राबविण्यात यश मिळविले आहे. समाजातील सामान्यातील सामान्य माणसापर्यंत योजनांचा लाभ पोहचविण्यात केंद्र व राज्य सरकार यशस्वी ठरले आहे.
याप्रसंगी राज्याचे अर्थमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर महानगरपालिकेत पक्षाला स्पष्ट बहुमत मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी अविश्रांत परिश्रम घ्यावे, असे आवाहन करून या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीची डिपॉजिट जप्त होईल अशा पद्धतीने नियोजन करून कार्य करावे. भाजपच्या अडीच वर्षाच्या सत्ताकाळात महानगरातील विकास कामाच्या भरोशावर आपण स्पष्ट बहुमत संपादन करू शकतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.कार्यकर्ता मेळाव्यात महानगरातील पदाधिकारी, उपस्थित होते.(नगर प्रतिनिधी)