बल्लारपूर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकींच्या हालचालींना वेग
By Admin | Updated: June 27, 2015 01:32 IST2015-06-27T01:32:41+5:302015-06-27T01:32:41+5:30
राज्य निवडणूक आयोगाने दुसऱ्या टप्प्यात चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.

बल्लारपूर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकींच्या हालचालींना वेग
बल्लारपूर : राज्य निवडणूक आयोगाने दुसऱ्या टप्प्यात चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार बल्लारपूर तालुक्यातील १७ पैकी १० ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक येत्या ४ आॅगस्टला होऊ घातली आहे. सदर ग्रामपंचायतीचे नवीन सरपंच कोण होणार, याचे वेध मतदारांना लागले आहे. आता बल्लारपूर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकींच्या हालचालीने वेग घेतला असून ग्रामीण भागातील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे.
बल्लारपूर तालुक्यात विसापूर, नांदगाव (पोडे), पळसगाव, हडस्ती, कळमना, मानोरा, आमडी, कोर्टिमक्ता, किन्ही व गिलबिली येथील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक यावर्षी होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महिलांना ५० टक्के आरक्षण मिळाल्याने राजकीय पक्षांनी उमेदवारांची शोध मोहीम सुरू केली आहे. अशातच राखीव जागेवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना जातीचे प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक असल्याने उमेदवारांसह कार्यकर्तेही प्रमाणपत्र मिळविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.
तालुक्यात विसापूर सर्वात मोठी ग्रामपंचायत असून एकुण १७ जागांपैकी ९ जागेवर महिलांना प्रतिनिधीत्व मिळणार आहे. पळसगावमध्ये एकुण ९ पैकी ५ जागेवर महिला उमेदवार निवडल्या जातील. किन्ही येथे एकूण ७ ग्रामपंचायत सदस्यापैकी ४ महिलासाठी राखीव आहेत. मानोरा येथे ९ पैकी ५, आमडी येथे ७ पैकी ४, कोर्टिमक्ता येथे ७ पैकी ४, कळमना येथे ९ पैकी ५, हडस्ती येथे ७ पैकी ४, नांदगाव (पोडे) येथे ११ पैकी ६ तर गिलबिली येथे ९ पैकी ५ जागा महिलांना आरक्षित करण्यात आल्या आहेत.
यामुळे गावपातळीवर राजकारणात महिलांचे वर्चस्व आगामी निवडणुकीत दिसून येणार आहे. ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका ४ आॅगस्टला घेण्याचे निश्चित झाल्याने गावपातळीवरचे राजकारण ढवळून निघायला सुरूवात झाली आहे. राजकीय पक्षाने उमेदवार निवडण्यासाठी मोर्चेबांधणीला वेग दिला आहे. प्रत्येकजण राजकारणाच्या बाता रंगविताना दिसून येत आहे. बल्लारपूर तालुक्यात १० ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊ घातल्या असून यातील सहा ग्रामपंचायतीवर काँग्रेसप्रणित आघाडीचे तर चार ग्रामपंचायतीमध्ये भाजपाचे सरपंच आहेत. गावातील सत्ताकारण आपल्या पक्षांकडे राहावे म्हणून काँग्रेस व भाजपाचे कार्यकर्ते डावपेच आखत आहेत. केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार असल्याने गावातील राजकारण ताब्यात घेण्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते उत्साहित आहेत. (शहर प्रतिनिधी)
असा आहे ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम
ग्रामपंचायत निवडणुकीची सुरूवात ४ जुलै रोजी नोटीस प्रसिद्धीने होणार आहे. १३ ते २० जुलै दरम्यान निवडणुकीतील उमेदवारांना नामनिर्देशन पत्र दाखल करावे लागणार आहे. नामनिर्देशन पत्राची छाननी २१ तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख २३ जुलै आहे. त्याच दिवशी दुपारी ४ वाजतानंतर निवडणूक चिन्हाचे वाटप करण्यात येणार आहे. मतदान ४ आॅगस्टला सकाळी ७.३० वाजता ते सायंकाळी ५.३० वाजता दरम्यान घेतले जाणार असून मतमोजणी ६ आॅगस्टला तहसील कार्यालयात केली जाईल.
सरपंच पदाचा मान या जाती प्रवर्गांना मिळणार
बल्लारपूर तहसील प्रशासनाने सरपंच पदाचे आरक्षण सोडत २६ मार्च रोजी काढली होती. त्यानुसार आगामी ग्रामपंचायत निवडणुकीनंतर तालुक्यातील विसापूर येथे अनुसूचित जाती महिला सरपंच होणार आहे. हडस्ती व गिलबिली येथील सरपंच पद सर्वसाधारण वर्गासाठी आहे. नांदगाव (पोडे) व पळसगाव येथे अनुसूचित जातीच्या प्रवर्गाला सरपंच पदाचा मान मिळणार आहे. किन्ही व कळमना ग्रामपंचायतीवर अनुसूचित जमाती महिलांना, मानोरा व आमडी ग्रामपंचायतीमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिला तर कोर्टिमक्ता ग्रामपंचायत सर्वसाधारण महिलेच्या ताब्यात राहणार आहे. १० पैकी ६ ग्रामपंचायतीवर महिलाराज येणार आहे.