तब्बल २५ दिवसानंतर झाली आई-मुलाची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 05:01 IST2020-04-26T05:00:00+5:302020-04-26T05:01:08+5:30
बोरचांदली येथील चौथीत शिकणाऱ्या संकेत रामटेके या बालकाच्या वडिलाचे १ एप्रिल रोजी निधन झाले. मात्र तेलंगणात मिरची तोडण्यासाठी गेलेली संकेतची आई लॉकडाऊनमुळे अंत्यसंस्कारासाठी घरी येऊ शकली नाही. अखेर आईच्या अनुपस्थितीत संकेतने वडिलाच्या चितेला भडाग्नी दिली. समाजमन हादरून सोडणाºया रामटेके कुटुंबाची माहिती पोलीस उपअधीक्षक शेखर देशमुख यांना मिळाली.

तब्बल २५ दिवसानंतर झाली आई-मुलाची भेट
लोकमत न्यूज नेटवर्क
वढोली : मिरची तोडण्यासाठी तेलंगणा राज्यात गेलेली आई लॉकडाऊनमुळे अडकली होती. दरम्यान पतीचे अचानक निधन झाले. मात्र पत्नीला अखेरचे दर्शनही घेता आले नाही. मुलाची काळजी आणि पती गेल्याच्या दु:खाने अस्वस्थ झालेल्या आईची तब्बल २५ दिवसानंतर मुलाशी भेट झाली, वेदनादायी असलेल्या सावली तालुक्यातील खेडी येथील या घटनेचा शेवट भेटीने झाल्याने वातावरण भावूक झाले होते.
बोरचांदली येथील चौथीत शिकणाऱ्या संकेत रामटेके या बालकाच्या वडिलाचे १ एप्रिल रोजी निधन झाले. मात्र तेलंगणात मिरची तोडण्यासाठी गेलेली संकेतची आई लॉकडाऊनमुळे अंत्यसंस्कारासाठी घरी येऊ शकली नाही. अखेर आईच्या अनुपस्थितीत संकेतने वडिलाच्या चितेला भडाग्नी दिली. समाजमन हादरून सोडणाऱ्या रामटेके कुटुंबाची माहिती पोलीस उपअधीक्षक शेखर देशमुख यांना मिळाली. गोंडपिपरीचे ठाणेदार संदीप धोबे यांना लगेच सूचना देऊन संकेतची आई कविता रामटेके यांना तेलंगणातून बोरचांदली येथे आणण्याचे कळविले. दरम्यान, राजुऱ्याचे आमदार सुभाष धोटे यांनीही प्रयत्न सुरू केले. पोलीस उपअधीक्षक शेखर देशमुख यांनी पोलीस आयुक्त कार्यालयातून सर्व कायदेशीर प्रक्रिया करून घेतल्या. त्यामुळे आई व मुलाची भेट होऊ शकली.
गोंडपिपरी पोलिसांकडून माणुसकीचे दर्शन
अखेर तेलंगणात अडकलेल्या कविताला आणण्यासाठी २३ एप्रिल रोजी परवानगी मिळाली. बोरचांदली येथून ६०० किलोमीटर दूर असलेल्या कविता रामटेके यांना आणण्यासाठी २४ एप्रिल रोजी तेलंगणात एक वाहन रवाना करण्यात आले. २४ तासांच्या प्रवासानंतर ती सावली तालुक्यातील खेडी येथे पोलिसांसह माहेरी पोहोचली. वडिलाचे निधन झाल्याने मुलगा संकेत हा खेडी येथे आजी आणि मामाकडे राहत होता. वडिलाची सावली हरवलेल्या संकेतला आई आल्याचे समजताच त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही.
लॉकडाऊनमुळे तेलंगणात अडकल्याने अनेक कायदेशीर अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे आई व मुलगा एकत्र आणण्याकरिता आयुक्त कार्यालयापर्यंत पाठपुरावा करावा लागला. पोलीस उपअधीक्षक शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनामुळे हे शक्य होऊ शकले.
- संदीप धोबे, ठाणेदार, गोंडपिपरी