मनरेगाची कामे अधिकाधिक सुरुकरा
By Admin | Updated: March 6, 2016 00:34 IST2016-03-06T00:34:34+5:302016-03-06T00:34:34+5:30
जिल्ह्यातील नागरिकांच्या हाताला काम देण्यासाठी मनरेगाची कामे अधिकाधिक सुरु करावी,...

मनरेगाची कामे अधिकाधिक सुरुकरा
हंसराज अहीर : केंद्र पुरस्कृत योजनांचा घेतला आढावा
चंद्रपूर : जिल्ह्यातील नागरिकांच्या हाताला काम देण्यासाठी मनरेगाची कामे अधिकाधिक सुरु करावी, असे निर्देश केंद्रीय रसायन व खते राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अंतर्गत असलेल्या जिल्हास्तरीय दक्षता व सनियंत्रण समितीच्या माध्यमातून केंद्र पुरस्कृत योजनांचा आढावा बैठकीत ते अधिकाऱ्यांशी बोलत होते.
जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरुनुले, आमदार नाना शामकुळे, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर,जिल्हा परिषद उपाध्यक्षा कल्पना बोरकर, सदस्य तुळशीराम श्रीरामे, सरिता वाभिटकर, होमदेव मेश्राम व प्रकल्प संचालक अशोक शिरसे उपस्थित होते.
जिल्ह्यात मनरेगांची मोठया प्रमाणात कामे सुरु करण्यासाठी गाव पातळीवर ग्रामसभा घेऊन गावांची निवड करावी. त्या गावातील नागरिकांच्या हाताला काम देण्यात यावे, असे अहीर यांनी सांगितले. ज्यांच्याकडे जॉब कार्ड नसेल अशा नागरिकांकडून अर्ज घेऊन त्यांनासुध्दा काम देण्यात यावे, असेही ते म्हणाले.
ज्या नळ योजनांना वीज पुरवठा नाही, अशा नळ योजनांची यादी तयार करण्याच्या सूचना ना.अहीर यांनी दिल्या. त्याच प्रमाणे वीज पुरवठा खंडीत असलेल्या नळ योजनांचा अहवाल सादर करण्यात यावा. ग्रामीण भागातील जनतेला पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे, अशी मागणी सदस्यांनी यावेळी केली असता उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले. ग्रामीण पाणी पुरवठा व त्यानुषंगाने असलेल्या प्रश्नासंबंधी आढावा बैठक लवकरच घेण्यात यावी, असे निर्देश संबंधित विभाग प्रमुखाला यावेळी दिले.
मनरेगांतर्गत पूर्ण झालेल्या कामांची रक्कम अद्यापही मजुरांना मिळाली नसल्याचे समिती सदस्यांनी सांगितले असता ही रक्कम त्वरित कामगारांना अदा करण्यात यावे, असे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले.
स्वच्छता अभियान, इंदिरा आवास घरकुल योजना व इतरही शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना मिळाला पाहिजे, यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची गरज असल्याचे ना.अहीर यांनी सांगितले.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, संपूर्ण ग्रामीण स्वच्छता कार्यक्रम, ग्रामीण पाणी पुरवठा योजना, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्र पुरस्कृत योजना, राष्ट्रीय सामाजिक सहाय योजना व इंदिरा आवास योजना आदी विषयांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.
या सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. बैठकीचे संचालन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अशोक शिरसे यांनी केले. (शहर प्रतिनिधी)