शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तहसीलवर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:12 IST2021-01-24T04:12:12+5:302021-01-24T04:12:12+5:30
तहसीलदारांना सादर केले निवेदन कोठारी : बल्लारपूर पंचायत समितीचे उपसभापती, भाजपा नेते सोमेश्वर पद्मगिरीवार यांनी सर्वसामान्य जनतेच्या, शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या ...

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तहसीलवर मोर्चा
तहसीलदारांना सादर केले निवेदन
कोठारी : बल्लारपूर पंचायत समितीचे उपसभापती, भाजपा नेते सोमेश्वर पद्मगिरीवार यांनी सर्वसामान्य जनतेच्या, शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या मागण्यांकरिता कोठारी ते बल्लारपूर तहसील कार्यालयापर्यंत पायी चालत मोर्चा काढला व राज्य सरकारचा निषेध केला.
सर्वसामान्य नागरिकांच्या, शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना त्यांनी सादर केले.
शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत नियमित कर्ज फेड करणाऱ्या थकीत नसलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून ५० हजार रुपयांपर्यंत रक्कम देण्याचे शासनाने जाहीर केले होते, परंतु ही प्रोत्साहनपर रक्कम अद्याप शेतकऱ्यांना दिलेली नाही. सदर रक्कम त्वरित देण्यात यावी, कोरोनाचे कारण सांगत शबरी आवास योजना, रमाई आवास योजनेचे पैसे थकीत आहेत. ही रक्कम त्वरित देण्यात यावी, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई एकरी २५ हजार रु. देण्याचे शासनाने जाहीर केले होते. ती रक्कम त्वरित देण्यात यावी, श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजना या योजनांच्या लाभार्थ्यांचे थकीत अनुदान त्वरित देण्यात यावे, भारनियमन त्वरित रद्द करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा आदी मागण्यांसाठी त्यांनी हा मोर्चा काढत तहसील कार्यालयाला धडक दिली.
या मोर्चाचे नेतृत्व सोमेश्वर पद्मगिरीवार यांनी केले. यावेळी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा नगराध्यक्ष हरीश शर्मा, भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे, सुनील फरकडे, विनायक कोसरे, श्यामराव जुनघरे, रूपेश पोडे, श्यामसुंदर झाडे, राजू रेनकुंटलवार, योगेश पोतराजे, गणपत मोरे, किसन उरकुडे, कल्पना देशमुख आदी उपस्थित होते.