नाणेबंदची अफवा अन् नागरिकांची गैरसोय

By Admin | Updated: January 2, 2017 00:51 IST2017-01-02T00:51:15+5:302017-01-02T00:51:15+5:30

पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या ५०० व १००० रुपयांच्या नोटाबंदीमुळे नागरिक मागील ५० दिवसांपासून अगदी

Money laundering and misuse of citizens | नाणेबंदची अफवा अन् नागरिकांची गैरसोय

नाणेबंदची अफवा अन् नागरिकांची गैरसोय

नागरिकांचा सवाल : कोण म्हणतो दहाचे नाणे बंद झाले ?
चंद्रपूर : पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या ५०० व १००० रुपयांच्या नोटाबंदीमुळे नागरिक मागील ५० दिवसांपासून अगदी मेटाकुटीस आले आहेत. व्यापार, बाजारपेठेत व्यवहार व दैनंदिन गरजा भागविण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. अशातच आता दहा रुपयांचे नाणे बंद झाल्याची अफवा सर्वत्र पसरली आहे. सरकारकडून वा प्रशासनाकडून यासंदर्भात कोणतीही घोषणा झाली नसताना व्यावसायिकांकडून केवळ अफवांवर विश्वास ठेवून नाणे घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. यामुळे आता नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारावरही परिणाम होत असून नागरिक अक्षरश: वैतागले आहेत.
चंद्रपूर शहरापासून ग्रामीण भागापर्यंत ही अफवा पसरली आहे. ती कोणी वा कोणत्या उद्देशाने पसरविली, हेदेखील एक कोडेच आहे. मात्र यामुळे नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागातील व्यवहार खोळंबले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या ८ नोव्हेंबरला १००० आणि ५०० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या. यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. जुन्या नोटा बदलून देण्यासाठी ५० दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. या निर्णयामुळे चलण टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी बँकेत नोटा बदलण्यासाठी रांगा लागल्या होत्या. ग्रामीण भागातील बहुतांश जनतेने आपल्याकडे असलेल्या नोटा बँकेत जमा केल्या. त्या मोबदल्यात दोन हजार रुपयांच्या नोटा मिळविल्या आहेत. दोन हजार रुपयांच्या चिल्लरसाठी नागरिकांना शोधाशोध करावी लागत आहे. अशातच आता पंतप्रधानांनी नागरिकांना मागितलेले ५० दिवसही संपले आहेत. तरीही चलनटंचाई व बँकेतील नागरिकांच्या रांगा तशाच कायम आहे. एटीएम केंद्रावरही अशीच परिस्थिती आहे.
अनेकांनी बँकांमधून पैसे काढताना दहा रुपयांचे नाणेसुद्धा देण्यात आले. मात्र आता १० रुपयांचे नाणे बंद झाल्याची अफवा पसरल्यामुळे अनेक व्यापारी व छोटेमोठे व्यावसायिक दहा रुपयांचे नाणे स्वीकारण्यास मनाई करीत आहेत. त्यामुळे नागरिकांजवळ असलेले १० रुपयांच्या नाण्याचे करायचे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेकांनी व्यावसायिकांची समजूत काढण्याचा प्रयत्नसुद्धा केला. मात्र, व्यावसायिक ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीत. दहा रुपयांच्या नाण्याबाबत भ्रामक कल्पना पसरविल्या जात आहे. या सर्व भानगडीत ग्रामीण भागातील जनता भरडली जात आहे. पूर्वीची चलनटंचाई व नाणेबंदीच्या अफवेने व्यवहारावर मोठा परिणाम होत आहे.आता जिल्हा प्रशासनानेच यावर तोडगा काढून वेगाने पसरत चाललेली अफवा थांबवावी व व्यावसायिकांची समजूत काढावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Money laundering and misuse of citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.