मोदी लाटेसोबत पक्षातील विरोधकांचा वडेट्टीवारांना फटका
By Admin | Updated: May 17, 2014 00:07 IST2014-05-17T00:07:14+5:302014-05-17T00:07:14+5:30
गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघातून डॉ. नामदेव उसेंडी यांना काँग्रेसची उमेदवारी जाहीर होताच, अगदी सहज वाटणारी निवडणूक काँग्रेस मोठय़ा मताधिक्याने हरली.

मोदी लाटेसोबत पक्षातील विरोधकांचा वडेट्टीवारांना फटका
घनश्याम नवघडे - चंद्रपूर गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघातून डॉ. नामदेव उसेंडी यांना काँग्रेसची उमेदवारी जाहीर होताच, अगदी सहज वाटणारी निवडणूक काँग्रेस मोठय़ा मताधिक्याने हरली. यामागे मोदी लाट हे प्रमुख कारण असले तरी या क्षेत्रातील प्रमुख नेत्यांनी आमदार विजय वडेट्टीवार यांच्यावर काढलेला राग असेच या पराभवाचे वर्णन करता येईल. मागील लोकसभा निवडणुकीत आमदार विजय वडेट्टीवार यांनी मारोतराव कोवासे यांना तिकीट मिळवून देण्यापासून तर त्यांना विजयी करण्यापर्यंत मोलाची भूमिका पार पाडली. पण निवडून आल्यानंतर काही दिवसातच कोवासे आणि वडेट्टीवार यांच्यातील सख्य संपले आणि कोवासे एकाकी पडले. मतदारांशी त्यांचा संपर्कच तुटला. ज्या गतीने कोवासे यांचा मतदारांशी संपर्क संपला, त्याच गतीने कोवासे यांच्या लोकप्रियतेत घट होत गेली. एक वेळ अशी आली की, काँग्रेसने कोणीही उमेदवार दिला तरी चालेल पण कोवासे नको, असे मतदार उघडपणे बोलायला लागले. मतदारांच्या या नाराजीचा कानोसा घेत आमदार विजय वडेट्टीवार यांनी खासदार कोवासे यांच्या विरोधात उघड भूमिका घेवून गडचिरोलीचे युवा आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांच्या उमेदवारीसाठी आकाशपाताळ एक केले. उसेंडी हे कसे वरचढ उमेदवार ठरू शकतात, हेसुद्धा पक्षश्रेष्ठींना पटवून देण्यात वडेट्टीवार यशस्वी झाले आणि आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांना गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राची काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर होताच, काँग्रेसला ही निवडणूक सहज वाटत होती. एक युवा आणि उच्च विद्याविभूषित, इंग्रजी, हिंदी आणि मराठी या तिन्ही भाषांवर सारखेच प्रभूत्व असलेला, लोकसभेत या भागाचे प्रश्न मांडू शकणारा उमेदवार म्हणून सामान्य मतदारांनीही डॉ. उसेंडी यांच्या उमेदवारीचे स्वागत केले. एवढेच नाही तर उसेंडी यांच्या उमेदवारीने भाजपमध्ये चांगलीच धडकी भरली होती. परिस्थिती अनुकूल असतानाही डॉ. नामदेव उसेंडी यांचे प्रमुख कारण मोदी लाट हे सांगता येईल. कोणी कितीही नाकारले तरी संपूर्ण मतदार संघात मोदींची एक सुप्त लाट दिसत होती. एकदा मोदीचा अनुभव घ्यायला काय हरकत आहे, असे प्रचार शेवटच्या टप्प्यात आल्यानंतर मतदार बोलू लागले. डॉ. नामदेव उसेंडी यांच्या पराभवामागे हे प्रमुख कारण तर आहेच; पण चिमूरचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी संपूर्ण निवडणूक अंगावर घेतल्याने डॉ. उसेंडी यांचा विजय झाला तर विजय वडेट्टीवार यांचे राजकीय वजन चांगलेच वधारेल, असा ग्रह त्यांच्या राजकीय विरोधकांनी करून घेतला. गेल्या पाच वर्षात दिल्ली मुंबईच्या राजकीय वतरुळात ज्या गतीने वडेट्टीवार यांनी आपले स्थान निर्माण केले त्याच गतीने या क्षेत्रात त्यांचे राजकीय शत्रूही तयार झालेत. हे कारण सुद्धा उसेंडी यांच्या पराभवाला तेवढेच पोषक ठरले, अशी चर्चा आता ऐकायला मिळत आहे.