मोबाईल बालपणच नव्हे, तर दृष्टीही हिरावते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2019 06:00 AM2019-09-12T06:00:00+5:302019-09-12T06:00:44+5:30
सध्या घरोघरी टीव्ही, मोबाईल, संगणक, लॅपटॉप, टॅब इत्यादी वस्तू दैनंदिन कामासाठी वापरल्या जातात. नवीन पिढी तर या सर्व साधनांची पुरस्कर्ती झालेली आहे. घरोघरी किमान दोन-तीन तरी स्मार्टफोन आहेतच. सुरुवातीला कुतुहल म्हणून मुलांच्या हातात दिलेला मोबाईल आता त्यांच्या सवयीचा झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आयुधनिर्माणी : ज्येष्ठांपासून तर चिमुकल्यांपर्यंत सगळ्यांनाच आता मोबाईलचा लळा लागला आहे. अहोरात्र मोबाईलमध्ये मान घालून बसल्याने अती वापरामुळे किशोरवयीन मुलांमध्ये एकलकोंडेपणा वाढून विविध समस्या निर्माण होत आहेत. सर्वाधिक समस्या बालकांमध्ये दिसत असून मोबाईल बालपणच, नव्हेतर दृष्टीही हिरावत आहे. त्यामुळे आता पालकांनीच पुढाकार घेऊन आपल्या पाल्याला मोबाईल पासून दूर ठेवणे गरजेचे आहे.
सध्या घरोघरी टीव्ही, मोबाईल, संगणक, लॅपटॉप, टॅब इत्यादी वस्तू दैनंदिन कामासाठी वापरल्या जातात. नवीन पिढी तर या सर्व साधनांची पुरस्कर्ती झालेली आहे. घरोघरी किमान दोन-तीन तरी स्मार्टफोन आहेतच. सुरुवातीला कुतुहल म्हणून मुलांच्या हातात दिलेला मोबाईल आता त्यांच्या सवयीचा झाला आहे. त्यामुळे त्यांना आता डोळ्यांच्याही आजारांचा सामना करावा लागत आहे. नेत्र तज्ज्ञांकडे जाणारे बहुतांश पालक मोबाईलमुळे आपल्या मुलांची दृष्टी कमी झाल्याची तक्रार घेऊन जातात. पालकांमध्ये २५ ते ३० टक्के पालक ही समस्या घेऊन तपासणीसाठी जात असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे पालकांनीच आता सजग राहण्याची वेळ आली असून आपला पाल्य किती वेळ अभ्यास करतो, ती वेळ टीव्ही बघतो, किती वेळ मोबाईलवर खेळतो आणि किती वेळ बाहेर खेळायला जातो. याकडे गांभीयार्ने लक्ष देण्याची गरज आहे.
पालकांसोबत केलेल्या चर्चेनुसार उच्च व मध्यमवर्गीयांंच्या मुलांमध्ये दूरचे वा जवळचे दिसत नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत. अनेक मुलांचा चष्म्याचा नंबर वाढल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील मुलांमध्ये सुध्दा डोळ्यांच्या आजाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांमध्ये डोळ्याचेच नाहीतर अन्य आजारांचेही प्रमाण वाढत आहे. मुले बाहेरचे खेळ विसरले आहे. त्यांच्यातील सुप्त गुण लोप पावत आहेत. ते अभ्यासाकडे दुर्लक्ष करीत आहेत. शारीरिक हालचालीच होत नसल्याने मुलांना भूक लागत नाही. पालक आमचा मुलगा जेवत नाही अशा तक्रारी घेऊन येतात.
सतत मोबाईल वापरामुळे डोळे ड्राय होऊन दृष्टीवर दुष्परिणाम होतात. मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. मोबाईलच्या अती वापरामुळे समाजापासून तो आपोआपच दूर जातो. अनेकदा मुले डिप्रेशनमध्ये पण जातात. मुलांनी लोकांत रमायला पाहिजे. पालकांनी मुलांना विविध अॅक्टिव्हिटीजमध्ये गुंतवावे. मैदानी खेळांसाठी प्रवृत्त करावे. एवढेच नाहीतर तर पालकांनीही आपल्या मोबाईल हाताळण्याच्या सवयी बदलायला हव्यात. घरात सारखे मोबाईलवर न राहता मुलांसोबत संवाद साधण्याची गरज आहे.
- डॉ. श्वेता शिंदे, नेत्ररोग तज्ज्ञ, भद्रावती
मोबाईलच्या अती वापरामुळे मुलांमध्ये नेत्र विषयक अनेक व्याधी जडल्या आहेत. अनेक फायदे असले तरी मोबाईलचा अतिरेकी वापर होणार नाही याची काळजी पालकांनी घेणे महत्त्वाचे आहे..
- डॉ. गजानन खामनकर, पालक, भद्रावती