दुधाळ गाईंचे वाटप करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:53 IST2021-02-18T04:53:02+5:302021-02-18T04:53:02+5:30

चंद्रपूर : जिल्ह्यात पशुधनाची संख्या मोठी आहे. मात्र, बऱ्याचशा पशुपालकांकडे हडकुळ्या गाई व बैल आहेत. या पशुधनाची व्यवस्था सांभाळताना ...

Milk cows should be distributed | दुधाळ गाईंचे वाटप करावे

दुधाळ गाईंचे वाटप करावे

चंद्रपूर : जिल्ह्यात पशुधनाची संख्या मोठी आहे. मात्र, बऱ्याचशा पशुपालकांकडे हडकुळ्या गाई व बैल आहेत. या पशुधनाची व्यवस्था सांभाळताना शेतकऱ्यांना त्रास होत आहे. आर्थिक उन्नतीसाठी शेतकऱ्यांना दुधाळ गाईचे वाटप करावे, अशी मागणी हाेत आहे.

मनपाने नळधारकांची तपासणी करावी

चंद्रपूर : शहरातील बहुतांश नळांना नागरिकांनी तोट्या लावल्या नाहीत. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होत आहे. येथील अनेक वॉर्डातील नागरिकांच्या घरातील नळाच्या तोट्या निकामी झाल्या आहेत. महापालिकेने नळधारकांची तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.

शासकीय इमारत परिसरात रोहित्र

चंद्रपूर : ग्रामीण व शहरातील बहुतांश शासकीय इमारतीच्या परिसरात विद्युत रोहित्र आहेत. बहुतांश रोहित्र उघडेच आहेत. शासकीय कार्यालयांमध्ये येणाऱ्या एखाद्या नागरिकाचा स्पर्श होऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महावितरण कंपनीने लक्ष घालून राेहित्र हटवावे, अशी मागणी हाेत आहे.

उघड्यावरील अन्नपदार्थांची विक्री थांबवा

चंद्रपूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागात काही ठिकाणी उघड्यावर अन्नपदार्थांची विक्री केली जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र स्वच्छतेवर भर दिला जात आहे. असे असले तरी काही ठिकाणी अन्नपदार्थांची विक्री केली जात असल्यामुळे, आरोग्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यामुळे संबंधितांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

सिग्नल बंदमुळे अपघाताची भीती

चंद्रपूर : शहरातील मिलन चौक व इतर काही चौकातील वाहतूक दिवे बंद असल्याने वाहतूक विस्कळीत होत आहे. याकडे वाहतूक शाखेने लक्ष देणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, गांधी चौकाकडे येणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने येथे नेहमी वाहतूककोंडी होत आहे. पोलीस प्रशासनाने अपघात टाळण्यासाठी सिग्नल सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

रस्त्यावर रेती टाकल्याने अडचण

चंद्रपूर : शहरातील बहुतांश रस्त्यावर रेती साचली असल्यामुळे अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे रेती उचलून रस्ते मोकळे करण्याची मागणी केली जात आहे. वाहने स्लिप होऊन अपघात होत आहेत. काही नागरिकांनी घराचे बांधकाम करण्यासाठी रेती टाकली. ही रेती रस्त्यावर असल्याने नागरिकांना ये-जा करण्यासाठी अडचण होत आहे. महापालिकेने याकडे लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

बीपीएल उत्पन्नाची मर्यादा वाढवा

नागभीड : बीपीएलचा लाभ २० हजार उत्पन्न मर्यादा असलेल्या नागरिकांना दिला जात आहे, परंतु नागरिकांच्या उत्पन्न मर्यादेत वाढ झाली असल्याने, बीपीएल यादीची उत्पन्न मर्यादा ५० हजार रुपयापर्यंत वाढवावी, अशी मागणी केली जात आहे.

शहरातील उघडे चेंबर धोकादायक

चंद्रपूर : शहरात अनेक ठिकाणी उघडे चेंबर आहेत. हे चेंबर अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहेत. येथून दररोज हजारो वाहनांची ये-जा असते. काही चेंबरवर बॅरिकेड्‌स ठेवण्यात आले आहेत, तर बहुतेक ठिकाणचे चेंबर उघडेच आहेत. त्यावर झाकणे लावण्याची मागणी करण्यात येत आहे.

ध्वनिप्रदूषणामुळे नागरिक हैराण

चंद्रपूर : वाहनांवर कर्णकर्कश हॉर्न लावण्यासाठी आणि भररस्त्यावर वाजविण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे; मात्र प्रेशर हॉर्न वापरणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाईची तरतूद करण्यात आली असताना, या निर्णयाची अंमलबजावणी होत नाही. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.

जड वाहतुकीवर बंदी घालण्याची मागणी

भद्रावती : तालुक्यात रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात जड वाहतूक सुरू असते. जड वाहतुकीमुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. याशिवाय सध्या बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे कंत्राटदार ट्रकद्वारे ओव्हरलोड वाळू व मुरुम वाहतूक करीत असल्याने याचा फटका रस्त्यांना बसत आहे.

लाभार्थ्यांना योजनेचा लाभ द्यावा

चंद्रपूर : श्रावणबाळ योजना, राजीव गांधी निराधार योजना, संजय गांधी निराधार योजना अशा योजनेंतर्गत वृद्धांना मानधन देण्यात येते. मात्र या योजनेचा लाभ घेताना वृद्धांना खूप अडचणी जाणवतात. पैसे जमा होण्याची निश्चित तारीख माहीत नसल्यामुळे बँकेभोवती चकरा माराव्या लागतात. तासन्‌तास रांगेत उभे राहावे लागते. यामुळे शासनाने यात नियमितता ठेवण्याची मागणी करण्यात येत आहे.

कोसंबी ते आवळगाव रस्त्याची दुरवस्था

ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी तालुक्यातील आवळगाव ते कोसंबी रस्त्याची अत्यंत दैनावस्था झाली आहे. हा रस्ता कित्येक वर्षांपासून कच्चा असून, या संपूर्ण रोडची गिट्टी उखडलेली असून, मोठमोठे खड्डे पडलेले आहेत.

रस्त्याची डागडुजी करावी

राजुरा : तालुक्यातील वरोडा-नांदगाव-कवठाळा या रस्त्याची अवस्था मागील अनेक दिवसापासून अतिशय दयनीय झाली असून, या रस्त्यावरून प्रवास करणे कठीण झाले आहे. अपघाताचेही प्रमाण वाढले आहे. परिसरातील नागरिकांना चंद्रपूर, घुग्घुस, वणी येथे जाण्याकरिता हा एकमेव मार्ग असल्याने तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी आहे.

कव्हरेजअभावी भ्रमणध्वनी सेवा ठप्प

गोंडपिपरी : ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात भ्रमणध्वनी ग्राहक आहेत. मात्र, मागील अनेक दिवसापासून कव्हरेजची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे भ्रमणध्वनीधारक त्रस्त असून अनेकांनी सीमकार्ड बदलवून नवीन सीमकार्ड खरेदीला पसंती दिली आहे. काही महिन्यापासून कंपन्यांच्या नेटवर्कमध्ये समस्या निर्माण झाली आहे.

विजेच्या लपंडाव दूर करावा

सिंदेवाही : परिसरात वीजपुरवठा नेहमी खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या समस्येकडे वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिकांची अनेक शासकीय कामे खंडित होत आहेत, याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Web Title: Milk cows should be distributed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.