संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर सभा
By Admin | Updated: November 16, 2015 00:55 IST2015-11-16T00:55:03+5:302015-11-16T00:55:03+5:30
२६ नोव्हेंबरला होणाऱ्या संविधान दिनानिमित्त संविधान जागृत अभियानाच्या अनुषंगाने इंडस्ट्रीयल वार्ड चंद्रपूर येथे सभेचे आयोजन करण्यात आले.

संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर सभा
चंद्रपूर : २६ नोव्हेंबरला होणाऱ्या संविधान दिनानिमित्त संविधान जागृत अभियानाच्या अनुषंगाने इंडस्ट्रीयल वार्ड चंद्रपूर येथे सभेचे आयोजन करण्यात आले.
या सभेला मार्गदर्शक म्हणून पी.आर. बोरकर, राजस खोब्रागडे, कांबळे उपस्थित होते. त्रिशरण पंचशिल ग्रहण करून सभेची सुरूवात करण्यात आली. सभेचे अध्यक्ष महादेव शामकुळे यांनी प्रास्ताविक केले. यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना पी.आर. बोरकर म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २६ नोव्हेंबर १९४९ ला भारतीय संविधान देशाला अर्पण केले आणि त्यानंतर २६ जानेवारी १९५० ला संविधान अंमलात येवून संपूर्ण भारतात जनतेचे राज्य निर्माण झाले. प्रत्येक नागरिकाला स्वत:च्या धर्माचा स्वतंत्र प्रचार आणि प्रसार करण्याची संधी या संविधानाच्या माध्यमातून प्राप्त झाली. त्याच्या कर्तव्याची, हक्काची, अधिकाराची, स्वातंत्र्याची, न्यायाची, बंधूतेची, समानतेची, समान संधी प्रत्येकाला संविधानाच्या माध्यमानेतून प्राप्त झाली आहे. म्हणून भारतीय संविधानाला जगात श्रेष्ठ समजल्या जाते. आणि यामुळेच संपूर्ण भारतवासी या संविधानामुळे एकोप्याने नांदत आहेत. संविधानात कोणत्याही एका धर्माला महत्व दिले नसून सर्व धर्म, पंथ यांना समान अधिकार दिलेले आहेत. प्रत्येक नागरिकास स्वतंत्र काम करण्याची, बोलण्याची, निवडणुकीत उभे राहण्याची समान संधी याद्वारे प्राप्त झाली आहे. म्हणून भारतीय संविधानच देशाला तारक आहे. दरम्यान, २६ नोव्हेंबरला होणाऱ्या संविधान सम्मान रॅलीमध्ये चंद्रपुरातील सर्वधर्मीय जनतेनी मोठ्या संख्येनी सहभागी व्हावे अशी विनंती यावेळी राजस खोब्रागडे यांनी केली. (शहर प्रतिनिधी)