मलई खाल्ली ग्रामपंचायतीने, शिक्षा मात्र एकट्या ग्रामरोजगार सेवकाला
By Admin | Updated: July 25, 2015 01:14 IST2015-07-25T01:14:35+5:302015-07-25T01:14:35+5:30
ब्रह्मपुरी तालुक्यातील पिंपळगाव (भो) येथील झालेल्या रोहयोच्या कामातील भ्रष्टाचाराची घटना शिवसेना व कष्टकरी ...

मलई खाल्ली ग्रामपंचायतीने, शिक्षा मात्र एकट्या ग्रामरोजगार सेवकाला
रोहयोतील भ्रष्टाचार : गटविकास अधिकाऱ्याकडून ग्रामसेवक व सरपंचाला वाचविण्याचे प्रयत्न
ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी तालुक्यातील पिंपळगाव (भो) येथील झालेल्या रोहयोच्या कामातील भ्रष्टाचाराची घटना शिवसेना व कष्टकरी महिलांच्या पुढाकाराने उघडकीस आली. यात भ्रष्टाचाराचे मुख्य सूत्रधार असलेले ग्रामसेवक, सरपंच व ग्रामरोजगार सेवक हे आहेत. ग्रामपंचायतीने २५४ बोगस मजुरांची नावे दाखवून २ लाख ३४ हजार ८४४ रुपयांचा घोटाळा केला. मात्र गटविकास अधिकाऱ्यांकडून या प्रकरणात सरपंच व ग्रामसेवकाला वाचविण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा असून त्यामुळे या प्रकरणात केवळ ग्रामरोजगार सेवक अडकणार आहे.
ब्रह्मपुरी तालुक्यातील पिंपळगाव (भो.) ग्रामपंचायती येथे बेरोजगारांना काम मिळावे, या उद्देशाने मनरेगामार्फत गावातील गरीब कष्टकरी मजुरांना काम देण्यात आले. परंतु सदर कामात मजुरी बरोबर मिळत नसून भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार शिवसेना व कष्टकरी महिलांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली. गटविकास अधिकाऱ्यांनी या कामाची चौकशी केली असता, २५४ बोगस मजुरांची नावे आढळून आली. तसेच दोन लाख ६४ हजार ८४४ रुपयांचा भ्रष्टाचार सात आठवड्याच्या काळात झाल्याचे चौकशीत उघड झाले. या कामात सरपंच, ग्रामसेवक व ग्रामरोजगार सेवक दोषी असल्याचे आढळून येत असले तरी गटविकास अधिकारी प्रकाश तोडेवार यांनी या भ्रष्टाचाराला ग्रामरोजगार सेवकच जबाबदार असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मात्र ग्रामरोजगार सेवकाला ग्रामसेवक व सरपंच यांच्या आदेशानुसार काम करावे लागते, असे असतानाही केवळ ग्रामरोजगार सेवक दोषी कसा, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
हजेरीबुकावर सरपंच, ग्रामसेवक व गटविकास अधिकारी यांची स्वाक्षरी आवश्यक असते. सरपंच व ग्रामसेवकाने हजेरी बुक न वाचता झोपेतच स्वाक्षरी केली काय? असाही प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
सदर प्रकरणात झालेल्या भ्रष्टाचाराची मलाई खाणारे अनेकजण असले तरी शिक्षेच्या वेळी मात्र यातील अनेक भ्रष्टाचारी ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका घेत आहेत. मनरेगाच्या कामात भ्रष्टाचार करणाऱ्या सरपंच व ग्रामसेवकाला गटविकास अधिकारी प्रकाश तोडेवार यांचे अभय मिळत असून त्यांना वाचविण्यासाठी गटविकास अधिकारी शर्तीचे प्रयत्न करीत असल्याची चर्चा गावकऱ्यांमध्ये आहे.
या भ्रष्टाचारात केवळ ग्रामरोजगार सेवकालाच आरोपी न करता जे अधिकारी व पदाधिकारी दोषी असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, व कष्टकरी गरीब महिलांना न्याय मिळवून द्यावा व हे प्रकरण अतिशय गंभीर असल्याने सदर प्रकरणाकडे जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: लक्ष द्यावे, अशी मागणी पिंपळगाव (भो.) येथील नागरिकांकडून केली जात आहे. (प्रतिनिधी)