अनुकंपाधारकांची यादी तयार करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:12 AM2021-01-24T04:12:45+5:302021-01-24T04:12:45+5:30
यादी तयार करावी चंद्रपूर : जि.प.ने अनुकंपाधारकांची यादी जाहीर केली. मात्र, शासनाच्या अन्य विभागांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. कुटुंबातील ...
यादी तयार करावी
चंद्रपूर : जि.प.ने अनुकंपाधारकांची यादी जाहीर केली. मात्र, शासनाच्या अन्य विभागांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेत त्यांच्या शिक्षण पात्रतेनुसार नोेकरीवर घेतले जाते, परंतु अन्य विभागांनी यादी तयार केली नाही. चंद्रपूर तहसील कार्यालयातही पदे रिक्त आहेत.
कस्तुरबा मार्गावर गतिरोधक निर्माण करा
चंद्रपूर : येथील कस्तुरबा मार्गावरील ज्युबिली हायस्कूलजवळ गतिरोधक नसल्याने अपघात होत आहेत. या रस्त्यावर एकही गतिरोधक नाही. त्यामुळे अनेक अपघात झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावर गतिरोधक तयार करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
तुकूम परिसरातील
नाल्या घाणीने तुंबल्या
चंद्रपूर : तुकूम परिसरातील विविध वाॅर्डांतील नाल्या घाणीने तुंबल्याने नागरिक हैराण आहेत. वाॅर्डातील नाल्यांचा उपसा होत नाही, असा आरोप आहे. घाणीमुळे रोगराई पसरू शकते. डासांचे प्रमाण वाढून आजार होऊ शकतात. त्यामुळे मनपाने स्वच्छता कर्मचाऱ्यांना तातडीने वाॅर्डात पाठविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
शिंगाडा व्यावसायिकांना हवे अर्थसाहाय्य
वरोरा : जिल्ह्यातील विविध तालुक्यांत कार्यरत मत्स्यपालन सहकारी संस्थेचे सभासद विविध मालगुजारी तलावांत शिंगाड्याचे उत्पादन घेतात. व्यवसायाकरिता कुठलेही अनुदान मिळत नाही. शिंगाडा लागवडीकरिता निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे नोंदणीकृत संस्थांना निधी देण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
निधीअभावी रखडले बंधाऱ्याचे बांधकाम
राजुरा : तालुक्यातील गोवरी गावालगतच्या नाल्यावर दहा-बारा वर्षांपूर्वी बंधारा बांधण्यात आला. मात्र, या बंधाऱ्याचे बांधकाम उशिरा सुरू झाल्यामुळे बांधकामाचे आर्थिक बजेट वाढत गेले. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराने काम बंद केले. या बंधाऱ्याचे काम निधीअभावी सध्या बंद अवस्थेत असून शासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
वीज वितरण जनित्र
बनले धोकादायक
कोरपना : वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे कोरपना तालुक्यातील अनेक गावांत डीपी रात्रंदिवस सतत उघड्या राहतात. यामुळे अपघात घडण्याची शक्यता आहे. याकडे वीज वितरण कंपनीने लक्ष देण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
ब्रह्मपुरी-वडसा
बायपास रोडची मागणी
ब्रह्मपुरी : शहरातील वर्दळ लक्षात घेता अपघाताला निमंत्रण देण्यापूर्वी ब्रह्मपुरी-वडसा रोडवर बायपास रोड ताबडतोब निर्माण करण्यात यावा, अशी मागणी ब्रह्मपुरी सिटीझन्स फोरम व ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या तिमाही सभेत करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी प्रा. सुभाष बजाज होते. या वेळी ज्येष्ठ नागरिकांच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
शहरात डासांचा
प्रादुर्भाव वाढला
चिमूर : शहरातील विविध वार्डांमध्ये घाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरिक हैराण झाले आहेत. वाॅर्डातील नाल्यांचा उपसा होत नाही. त्यामुळे तुडुंब भरल्या आहेत. घाणीमुळे रोगराई पसरू शकते. डासांचे प्रमाण वाढून आजार होऊ शकतात. त्यामुळे न.प.ने स्वच्छता कर्मचाऱ्यांना तातडीने वाॅर्डात पाठवावे. रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त
नागभीड : तालुक्यातील ग्रामीण भागात विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. याबाबत तक्रार करूनही लक्ष दिले जात नाही. परिणामी नागरिकांना अंधारात राहावे लागत असल्याचा आरोप केला जात आहे.