२८८ वीज ग्राहकांना महावितरणचा दणका
By Admin | Updated: December 26, 2016 01:12 IST2016-12-26T01:12:15+5:302016-12-26T01:12:15+5:30
महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळातील चंद्रपूर व गडचिरोली मंडळात खूप मोठ्या प्रमाणात वीज थकबाकी आहे.

२८८ वीज ग्राहकांना महावितरणचा दणका
वीजपुरवठा खंडीत : थकबाकीदारांविरोधात वीज कापण्याची मोहीम सुरू
चंद्रपूर : महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळातील चंद्रपूर व गडचिरोली मंडळात खूप मोठ्या प्रमाणात वीज थकबाकी आहे. याचा परिणाम वीज पुरवठ्यावर होत असल्याने चंद्रपूर, गडचिरोली, बल्लारपूर, वरोरा, ब्रम्हपुरी, आलापल्ली या सहाही विभागात थकबाकीदारांची वीज कापण्याची मोहीम वीज कंपनीने सुरू केली आहे. शनिवारच्या मोहीमेत पहिल्याच दिवशी तब्बल २८८ ग्राहकांची वीज कापून थकबाकीदारांना झटका देण्यात आला. त्यामुळे वीज बिलाचा वेळेत भरणा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
घरगुती, औद्योगीक व वाणिज्यीक थकबाकीदारांविरोधात वीजपुरवठा ख्ांडीत करण्याची ही धडक मोहीम असून या मोहिमेअंतर्गत एकाच दिवशी २८८ थकबाकीदार ग्राहकांचा १० लाखांच्या थकबाकीसाठी वीजपुरवठा ख्ांडीत करण्यात आला आहे. यात चंद्रपूर विभाातील ५२, बल्लारपूर विभागातील ३४, वरोरा विभागातील ११०, गडचिरोली ४३, आलापल्ली ८१ व ब्रम्हपुरी विभागातील ११ अशा एकंदरीत २८८ ग्राहकांचा समावेश आहे. तसेच ३ हजार ६२८ ग्राहकांकडून थकीत असलेले ४० रूपये थकीत बिलही वसुल करण्यात आले आहे.
महावितरणचे वीजबिल आल्या आल्या प्रामाणिकपणे भरणाऱ्या तसेच वीज बिल भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या ग्राहकांची विभागणी गेली आहे. वीजबिलाच्या वसुलीतूनच वसुल झालेल्या महसुलातून वीज खरेदी करणे व ती परत ग्राहकांना पुरविताना महावितरण थकबाकीदारामुळे अडचणीत येत आहे. परिणामी महावितरणला थकबाकीदार ग्राहकांविरोधात ही कारवाई करावी लागली आहे. आगामी काळात ही मोहिम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती महावितरणने दिली आहे.
या मोहिमेअंतगर्तत, बेकायदा वीजपुरवठा वापरणाऱ्या ग्राहकांवरही कठोर कारवाई करण्यात येत आहे. कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडीत ग्राहकांसाठी सुरू असलेल्या ‘नवप्रकाष योजनेचा’ कायमस्वरूपी वीजपुरवठा ग्राहकांनी लाभ घ्यावा. जबलाचा वेळेत भरणा करावा, असे आवाहन मुख्य अभियंता दिलीप घुगल यांनी केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
२२ कोटी ५६ लाखांची थकबाकी
सध्या स्थितीत चंद्रपूर परिमंडळातील सहाही विभागात घरगुती, औद्योगिक व वाणिज्यीक ग्राहकांकडे २२ कोटी ५६ लाखांची थकबाकी आहे. यात चंद्रपूर विभागात ५ कोटी ४८ लाख, वरोरा विभागात ३ कोटी ६३ लाख, बल्लारपूर ५ कोटी ३९ लाख, आलापल्ली २ कोटी ४४ लाख, ब्रम्हपुरी २ कोटी १ लाख व गडचिरोली विभागात ३ कोटी ९ लाख रूपये थकबाकी आहे. ‘ना नफा, ना तोटा’ तत्वावर ग्राहकांपर्यंत वीज पोहोचविणाऱ्या महावितरणला थकबाकीची झळ सोसावी लागत आहे.