महात्मा गांधी हे हिंदुस्थानच्या डीएनएचा भाग!

By Admin | Updated: February 1, 2017 00:33 IST2017-02-01T00:33:51+5:302017-02-01T00:33:51+5:30

राम, कृष्ण, बुद्ध यांच्याएवढेच गांधींही या देशाचे महनिय आहेत. म्हणूनच त्यांचे विचार देशातून जगात पोहचले.

Mahatma Gandhi is part of DNA of Hindustan! | महात्मा गांधी हे हिंदुस्थानच्या डीएनएचा भाग!

महात्मा गांधी हे हिंदुस्थानच्या डीएनएचा भाग!

सुरेश द्वादशीवार : द्विदिवसीय व्याख्यानमालेचा समारोप
चंद्रपूर : राम, कृष्ण, बुद्ध यांच्याएवढेच गांधींही या देशाचे महनिय आहेत. म्हणूनच त्यांचे विचार देशातून जगात पोहचले. त्यांचे चित्र कँलेंडरवरून काढले जाऊ शकते, पुढे ते नोटांवरूनही हटविले जाऊ शकते. मात्र लोकांच्या हृदयसिहासनावरून त्यांचे नाव कधीच काढले जाऊ शकत नाही. कारण ते या हिंदुस्थानच्या डिएनएचा एक भाग आहेत, असे भावपूर्ण प्रतिपादन लोकमतचे संपादक प्रा. सुरेश द्वादशीवार यांनी केले.
‘राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि टीकाकार’ या विषयावरील व्याख्यानमालेतील दुसरे व अंतीम पुष्प गुंफताना ते आपल्या अभ्यासपूर्ण विवेचनातून बोलत होते. फिमेल एज्युकेशन सोसायटीच्या वतीने स्व. ताराचंद खजांची स्मृती दोन दिवसीय व्याख्यानमालेच्या अखेरच्या दिवशीही मंगळवारी श्रोतृवृंद खचाखच भरलेला होता. आजचे व्याख्यान श्रोत्यांच्या प्रश्नांवर आधारित होते. आयोजकांनी केलेल्या सुचनेनुसार, नागरिकांनी दिलेल्या सुमारे १० लेखी प्रश्नांवर अभ्यासपूर्ण उत्तरे देऊन महात्मा गांधी आणि टीकाकार हा विषय मांडला. ते म्हणाले, अलीकडे गांधी आणि नेहरूंची बदनामी चालविली जात आहे. सोशल मिडीयावरून अर्ध्वयू नेतेही नको ते बोलताना दिसत आहे. गांधीची जनमानसावरील प्रतीमा हटवून आपली दैवते बसविण्याचा हा डाव आहे.
गांधींनी चातुर्वण्यव्यवस्थेचे समर्थन प्रारंभीच्या काळात केले. मात्र १९२० नंतर त्यांनी या व्यवस्थेचा जाहीरपणे निषेधच केला. असामान्य माणसे स्वत:ला कालानुरूप बदलून घेतात. गांधी जातीयतेचे कडवे विरोधक होते. भगतसिंगांना झालेली फाशी गांधींनी इंग्रज अधिकाऱ्यांशी बोलून टाळली नसल्याच्या आरोपाचेही त्यांनी खंडन केले. गोलमेज परिषदेच्या वाटाघाटी आणि त्यानंतरचा प्रसंग त्यांनी सांगितला.
आपल्या गरजा कमी असाव्यात, संपतीचा उपभोगही कमीत कमी घ्यावा, संपतीकडे विश्वस्ताच्या भावनेने बघावे, अशी त्यांची अपरिसंग्रह (असंग्रह) वृत्ती होती.
देशाच्या अर्थव्यवस्थेवरही प्रा. द्वादशीवार यांनी प्रकाश टाकला . ते म्हणाले, उद्योगपती पंतप्रधानांच्या पाठीवर थोपटत असल्याचे आजचे चित्र यापूर्वी कधीच नव्हते. खुली अर्थव्यवस्था हे भांडवलीशाहीचे गोंडस नाव आहे. चिनने समाजवाद सोडून खुल्या अर्थव्यवस्थेचा स्विकार केला. देशाची अर्थव्यवस्था रोजंदारीपेक्षा गृहोद्योगावर भर देणारी आहे. गांधींनी सांगितलेला विचार आणि कार्यक्रम स्विकारला आणि उद्यागांच्या बाबतीत देश चिनच्या वळणाने गेला तर चित्र बदलू शकेल.
गांधीवर होणाऱ्या मुस्लिमधार्जिणेपणाच्या आरोपवरही प्रा. द्वादशीवार यांनी विस्तृत विवेचन केले. १८५२ मध्ये झालेला फाळणीचा पहिला प्रयत्न या पासून तर पुढे मुस्लिम लिग, हिंदू महासभा, हदिस, अलीगढ पीठ, देवबंध पीठ, बॅरिष्टर जीना, इंग्रजांची भूमिका विस्तृतपूर्वक मांडत त्यांनी गांधींची छबी स्पष्ट केली. फाळणीला गांधी जबाबदार नसून मौलाना अबुल कलाम आझाद, महात्मा गांधी यांनी फाळणीचा विरोधच केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रारंभी स्वागतगीत झाले. गुणवंत विद्यार्थीनींचा सत्कारी यावेळी करण्यात आला. माजी केंद्री अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे, माजी खासदार नरेश पुगलिया, अ‍ॅड, एकनाथराव साळवे, अ‍ॅड. खजांची, व्ही.डी. मेश्राम आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. संस्थाध्यक्ष अ‍ॅड. विजय मोगरे यांनी पुढाकार घेऊन ही व्याख्यानमाला यशस्वी केली.(जिल्हा प्रतिनिधी)

सावरकरांचे भक्त गांधींवर टीका करतात. प्रत्यक्षात गांधींनी सावरकरांवर कधीच टीका केली नाही. दोघांत प्रकृतीभेद असला तरी माणुसकीचा ओलावा होता. सावरकरांच्या भेटीसाठी गांधीजी कस्तुरबांना घेऊन स्वत: त्यंच्या घरी गेले होते. खडतर जीवन जगणाऱ्या सावरकरांची पत्नी कशी आहे, हे कस्तुरबांना पहायचे असल्याने उभयता आलो, असे सांगत त्यांनी सावरकरांच्या पत्नीचे दर्शन घेतले.

Web Title: Mahatma Gandhi is part of DNA of Hindustan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.