महात्मा गांधी हे नेत्यांचे महानेते
By Admin | Updated: January 31, 2017 01:46 IST2017-01-31T01:46:09+5:302017-01-31T01:46:09+5:30
महात्मा गांधी हे अडाण्यांचे पुढारी असल्याची टीका त्या काळात झाली. मात्र त्यांना मानणारे तत्कालिन नेते

महात्मा गांधी हे नेत्यांचे महानेते
सुरेश द्वादशीवार : दोन दिवसीय व्याख्यानमालेत प्रतिपादन
चंद्रपूर : महात्मा गांधी हे अडाण्यांचे पुढारी असल्याची टीका त्या काळात झाली. मात्र त्यांना मानणारे तत्कालिन नेते मोठी उंची असणारे आणि जनसामर्थ्य लाभलेले होते. त्या सर्वांचे पुढारी महात्मा गांधी हे असल्याने ते खऱ्या अर्थाने नेत्यांचे महानेते होते, असे प्रतिपादन लोकमतचे संपादक प्रा. सुरेश द्वादशीवार यांनी केले.
स्थानिक फिमेल एज्युकेशन सोसायटीच्या वतीने स्व. ताराचंद खजांची स्मृती दोन दिवसीय व्याख्यानमालेला सोमवारी सायंकाळी प्रारंभ झाला. त्या प्रसंगी ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि टीकाकार’ या विषयावर पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते.
स्वातंत्र्यपूर्व इतिहासाचा संदर्भ घेवून विविध दाखले देत प्रा. सुरेश द्वादशीवार यांनी तब्बल तासभर श्रोत्यांना खिळवून ठेवले. ते म्हणाले, १९१६ मध्ये काँग्रेसमध्ये मागच्या रांगेत बसणारे महात्मा गांधी १९२१ मध्ये पक्षाचे मध्यवर्ती नेते झाले, ते सहजासहजी नव्हे. त्यांचे मोठेपण लोकमान्य टिळकांनी ओळखले होते. चर्चीलनेही त्यांच्या मोठेपणाची भविष्यवाणी केली होती. गांधी हे केवळ बोलके पुढारी नव्हते तर, समन्वयी नेते होते. राजा, धर्मगुरू, सेनापती, असे कोणतेही मोठे पद पाठीशी नसताना लाखो माणसे त्यांच्या पाठीमागे वेड्यासारखी कशी गेली? त्यांच्या आवाहनावर लाठ्या खाण्यापासून तर मरायला माणसं तयार कशी झाली, हे टीका करणाऱ्यांनी समजून घ्यावे.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी हाती शस्त्र घेवून लढणारे जगाच्या पाठीवर अनेक असतील, पण नि:शस्त्रपणे लढणारे जगात महात्मा गांधी एकमेव आहेत. मार्टीन ल्युथर किंग, नेल्सन मंडेला यांनीही त्यांच्या नि:शस्त्र लढ्याला महात्मा गांधींची पे्ररणा मानले, हा इतिहास आहे.
प्रा. द्वादशीवार पुढे म्हणाले, देशाला स्वातंत्र सशस्त्र क्रांतीने मिळाले की बापुंच्या नि:शस्त्र लढ्याने, असा प्रश्न देशात नेहमी विचारला जातो. मात्र त्याचे उत्तर टिळकांनी आधीच दिले होते. या देशातील माणसे हल चालविणारी आहेत, तलवार नव्हे. त्यामुळे स्वातंत्र्यांचा लढा त्यातूनच सिद्ध होईल. महात्मा गांधींनी नेहरूंना आपले राजकीय वारसदार नेमले. ते लोकनेते होते. त्यांचे नेते गांधी होते. सरदार वल्लभभाई पटेल गुजरातचे नेते होते.
शेतकऱ्यांसाठी त्यांनी देशात पहिला लढा उभारला. त्या पटेलांचे गांधी हे नेते होते. मौलाना अबुल कलाम आझाद हे देशातील मुस्लिमांचे नेते होते. गांधी हे त्यांचे नेते होते. राजगोपालचारी दक्षिण भारताचे नेते होते. राजेंद्रप्रसाद बिहार, आसाम, ओरिसाचे पुढारी होते. त्यांचेही पुढारी महात्मा गांधी होते, हे समजून घ्यावे. (जिल्हा प्रतिनिधी)
नीतीचे तेज
४गांधींनी मिठाचा सत्याग्रह केवळ ७८ माणसांना सोबत घेवून केला. मात्र या लढ्यात संपूर्ण देशच त्यांच्यासोबत चालत होता. मुठभर मिठ उचलून त्यांनी सविनय कायदेभंग केला. त्या सायंकाळी देशातील समुद्रतटावर ठिकठिकाणी लोकांनी पुढे येवून मिठ बनविले, ही त्यांच्या लढ्याची ताकद होती. जनतेच्या एकजुटीचे सामर्थ्य आणि नितीचे तेज किती मोठे असते हे त्यातून दिसते.
धारिष्ट्यवान गांधी
४महात्मा गांधींचे धारिष्ठ्य सांगताना प्रा. द्वादशीवार यांनी एक प्रसंग सांगितला. साबरमती आश्रमावर सर्वांचा समान हक्क आहे, असे ते म्हणायचे. इतरांनाही तसे वागायला लावायचे. आश्रमाची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने जेवणही निकृष्ठ असायचे. अशातच कस्तुरबा गांधी यांच्या माहेरची मंडळी आश्रमात आली. जेवणानंतर त्यांनी कस्तुरबांकडे २५ रूपये दिले आणि म्हणाले, निदान मुलाबाळांना तरी चांगले खाऊ घाल. कस्तुरबांनी ते पैसे स्वत:कडे ठेवून घेतले. मात्र काही दिवासांनी बापुंना ही गोष्ट माहीत झाली. त्यावर त्यांनी ‘हरिजन’मध्ये कस्तुरबांच्या विरोधात निषेधाचा लेख लिहिला. एवढेच नाही तर त्यांच्या निषेधार्थ एक दिवसाचा उपवासही केला. आपल्याच माणसांविरूद्ध जाहीरपणे असे करायला धारिष्ठ्य लागते. ते त्यांच्या अंंगी होते म्हणूनच गांधी लोकनेते झाले.