सरत्या वर्षात ५२७ वीजचोरांना महावितरणचा ‘शॉक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2017 01:08 IST2017-01-01T01:08:51+5:302017-01-01T01:08:51+5:30
महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात गेल्या वर्षात वीजचोरांना चांगलाच दणका बसला. चंद्रपूर परिमंडळात चंद्रपूर

सरत्या वर्षात ५२७ वीजचोरांना महावितरणचा ‘शॉक’
३८ लाखांच्या वीजचोऱ्या : ५३ जणांविरुध्द केला गुन्हा दाखल
चंद्रपूर : महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात गेल्या वर्षात वीजचोरांना चांगलाच दणका बसला. चंद्रपूर परिमंडळात चंद्रपूर व गडचिरोली मंडळ मिळून ५२७ वीजचोरांना महावितरणने यंदा जोरदार शॉक दिला. या वीज चोरांनी तब्बल ३७ लाख ९४ हजार रुपयांची वीजचोरी केल्याचे आढळून आले. या ४१६ ग्राहकांकडून वीजचोरीपोटी असलेली ३० लाख २७ हजारांची रक्कम वसूल करण्यात आली. याशिवाय वीजचोरी करणाऱ्या ५३ जणांविरूध्द गुन्हाही नंोदविण्यात आला.
चंद्रपूर मंडळाने १ एप्रिल २०१६ ते ३१ नोव्हेंबर २०१६ पर्यंत १६ लाख ०६ हजार रूपयांच्या वीजचोऱ्या एकटया चंद्रपूर मंडळात उघडकीस आणल्या व एकूूण १५२ वीजचोरांवर कडक कारवाई करण्यात आली. गडचिरोली मंडळाने २१ लाख ८२ हजार रूपयांच्या वीजचोऱ्या उघडकीस आणल्या व एकूण ३७५ वीजचोर महावितरणने केलेल्या कारवाईत सापडले.
यापैकी सर्वाधिक २०१ प्रकरणे ब्रम्हपुरी विभागातील असून, १०८ प्रकरणे गडचिरोली विभाग, ६६ आलापल्ली, २६ वरोरा विभागातील, ६६ बल्लारपूर विभाग तर ६० चंद्रपूर विभागातील आहेत.
या सर्व वीजचोरांविरूध्द, वीजकायदा २००३ च्या कलम १३५ अंतर्गत कारवाई करण्यात आल्याची माहिती महावितरणचे जनसंपर्क अधिकारी आनंद कुमरे यांनी दिली. आढळलेल्या वीजचोऱ्यात २५१ वीजचोरांनी आकडे टाकून तर २७६ वीजचोरांनी सरळ मीटरसोबत छेडछाड करीत वीजचोरी केल्याचे महावितरणच्या गस्ती पथकास आढळून आले.
वीजचोरी करण्यासाठी वीजचोरांनी मीटरमधील कॉईलची लांबी कमी करणे, रिमोट कंट्रोलचा वापर, मीटर बायपास करणे किंवा विना मीटर वीजवापर करणे, मीटरमध्ये रेजिस्टंस टाकणे अशा विविध क्लुप्त्या वापरून वीजचोरी केल्याचे आढळले. चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल यांनी वीजग्राहकांना वीजचोरीपासून प्रवृत्त होण्याचे व वीजबील वेळेवर भरून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. (शहर प्रतिनिधी)
पावसाचा बसला होता फटका
अवकाळी पाऊस तसेच वादळवाऱ्यामुळे सरत्या वर्षात महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळातील चंद्रपूर व गडचिरोली या दोन जिल्हयात ़एकूण ७१४ उच्चदाबाचे तर १९५२ लघुदाबाचे खांब तर १४६ रोहित्राचे नुकसान झाले आहे. यापैकी ६७२ उच्चदाबाचे तर १८७८ लघुदाबाचे खांब पूर्ववत उभे करण्यात आले. तसेच १४४ रोहित्र दुरूस्त करण्यात आले. विशेष म्हणजे, सरत्या वर्षात महावितरण कंपनीकडून तब्बल चार हजार ७८ कृषीपंपाच्या वीज जोडण्या करून देण्यात आल्याची माहिती महावितरणने दिली.