महादेवाला जातानाचे रडणे आता थांबले

By Admin | Updated: March 6, 2016 00:43 IST2016-03-06T00:43:27+5:302016-03-06T00:43:27+5:30

मध्य प्रदेशातील पचमढी या शहरापासून सुमारे १५-२० किमी अंतरावरील सातपुडा पहाडावरच्या मोठा महादेवाचे विदर्भातील ...

Mahadevala's crying stopped now | महादेवाला जातानाचे रडणे आता थांबले

महादेवाला जातानाचे रडणे आता थांबले

वसंत खेडेकर बल्लारपूर
मध्य प्रदेशातील पचमढी या शहरापासून सुमारे १५-२० किमी अंतरावरील सातपुडा पहाडावरच्या मोठा महादेवाचे विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, वर्धा, वणी, बल्लारपूर, गोंडपिंपरी इत्यादी भागातील भगवान शंकराच्या भक्तांना मोठे आकर्षण ! दरवर्षी राखी पौर्णिमा, नामपंचमी आणि महाशिवरात्रीला येथून असंख्य भाविक गाड्या भरुन महादेव यात्रेला जात असतात. भाविकांचे मोठा महादेव हेआकर्षण गेल्या सात-आठ दशकापासून तर आजवर कायम आहे. त्यात दिवसेंदिवस वाढच होत आहे.
महादेव यात्रेला जाण्याकरिता पूर्वीहून आता कितीतरी सोयी झाल्या आहेत. रस्ते सुधारले, रहदारी साधनात वाढ झाली. पहाडी वाटेने, गंतव्य स्थळी जाण्याकरिता सोयीयुक्त पायऱ्या झाल्या. दोनही बाजूने कटघरे (रेलिंग) लावण्यात आल्या. ४०-५० वर्षांपूर्वी मात्र या प्रवासात तशा सुविधा नव्हत्या. भाविकांना रेल्वेने आणि त्यानंतर बराच प्रवास पायी करावा लागायचा. मध्य प्रदेशातील जुन्नारदेव हे रेल्वेचे या भागाकरिता जाण्यासाठी सोयीचे स्टेशन. त्यानंतर शंकराचे ठिकाण असलेल्या चौरागडला बरेच अंतर कापून पायी जावे लागायचे. रस्ता ओबडखाबड व कठीण असल्याने यात्रा पार करताना रस्त्यात मोठ्या अडचणी येत पहाडाच्या पायथ्याशी आल्यावर हिरवा या ठिकाणी आंघोळ व पूजा आटोपून पहाड चढणे सुरू व्हायचे. तीन मोठाले पहाड पार करीत मोठा महादेव स्थळ गाठावे लागते. पायथ्यापासून सुमारे तीन तासांचा १३०० पायऱ्या पार करण्याचा हा प्रवास म्हणजे कठीणच काम होते.
त्याचे कारण, पूर्वी पायऱ्या सुरक्षित नव्हत्या आणि बाजूला सुरक्षित कठडे नव्हते. दोन्ही बाजूला मोठमोठ्या दरी आणि त्यातून हा मार्ग गाठणे एकंदरीत, महादेवाची यात्रा अवघड मानली जात होती.
पायऱ्या पार करताना गर्दीच्या समयी धक्काबुक्कीत तोल जाऊन कुणी खाली पडला तर त्याचे जिवंत राहणे कठीणच! यामुळे महादेवाचे दर्शन घेण्याला गेलेला परत येईलच याची शाश्वती नाही, असे मानले जाई आणि म्हणून तशा काळी महादेव यात्रेला जाणाऱ्या भाविकांना सार (निरोप) देण्याकरिता त्यांचे नातेवाईक वा परिचित दुरवरुन येत आणि घरुन निघताना हुदके देत रडत असत.
जाणारे आणि निरोप देणारे दोघेही असे रडत आणि तोंडी हर हर महादेव... चा गरज व महादेवाचे गाणे असा प्रकार चालायचा.
पोहा (मिरवणूक) ने भक्तांना रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचविले जायचे. (अजूनही काही जण ‘पोहा’ने स्टेशनवर जातात.) पण आता काळ बदलला, साधने खूप झालीत. रेल्वेहून आणि कठीण मार्गाहून ट्रॅव्हल्स, सुमो या साधनांनी जाणे व झटपट यात्रा खूपच सोपी झाली आहे. महादेवाला गेलेला भक्त परत येणार की नाही, ही गोष्टच आता बाद झाली. आज सायंकाळला सुमोने घरुन निघा व परवा दुपारपर्यंत घरी सुखरुप व आरामाने परत या, यामुळे आता सार करताना कुणीच पूर्वीसारखे रडत नाहीत. उलट हसत हसत निरोप देतात आणि महादेवाची गाण म्हणतात... महादेवा येतो गा...माझ्या सांबाऽऽऽ

Web Title: Mahadevala's crying stopped now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.