कालव्याच्या पाण्याने शेतकऱ्यांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:52 IST2021-02-18T04:52:11+5:302021-02-18T04:52:11+5:30
नागभीड : गोसेखुर्द प्रकल्पाच्या घोडाझरी उपकालव्यातून उपसा केलेले पाणी शेतकऱ्यांच्या शेतात घुसल्याने कोदेपार परिसरातील शेतीचे नुकसान झाले आहे. व्यवस्थापनाने ...

कालव्याच्या पाण्याने शेतकऱ्यांचे नुकसान
नागभीड : गोसेखुर्द प्रकल्पाच्या घोडाझरी उपकालव्यातून उपसा केलेले पाणी शेतकऱ्यांच्या शेतात घुसल्याने कोदेपार परिसरातील शेतीचे नुकसान झाले आहे. व्यवस्थापनाने या नुकसानीची भरपाई करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
तालुक्यातील कोदेपार परिसरात घोडाझरी उपकालव्याच्या कामाची सुरुवात होणार आहे. यासाठी कालव्यात जमा असलेल्या पाण्याचा उपसा करण्याचे काम सुरू आहे. काही दिवसांपासून पाणी उपसण्याचे काम सुरू आहे. हे पाणी वाहून जाण्यासाठी व्यवस्थापनाने जंगलाच्या दिशेने नाली तयार केली आहे. मात्र ही नाली कमकुवत असल्याने फुटली आणि संपूर्ण पाणी शेतकऱ्यांच्या शेतात घुसले. बुधवारी सकाळी ही बाब शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर व्यस्थापनाला कळविले. व्यवस्थापनाने लगेच पाण्याचा उपसा करणाऱ्या मोटारी बंद केल्या. पण तोवर अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसल्याने शेतातील रब्बी पिकांचे बरेच नुकसान झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार रामकृष्ण कोडापे एक एकर जागेतील जनावरांसाठी ठेवलेला कुटार, यशवंत नवघडे यांच्या दोन एकर जमिनीतील लाखोळी आणि जनावरांसाठी लावलेला हिरवा चारा पूर्ण पाण्यात बुडला आहे, शरद सहारे यांच्या दोन एकर शेतातील लाखोळी आणि उडीद पिकाचे नुकसान झाले आहे. विनायक गायकवाड यांच्या तीन एकरातील मूग पूर्ण पाण्यात बुडला असून, संजय सहारे यांच्या दोन एकरातील लाखोळीही पाण्यात बुडाली असल्याची माहिती आहे.