सिंचनाअभावी पिके लागली करपायला

By Admin | Updated: November 2, 2016 00:58 IST2016-11-02T00:58:26+5:302016-11-02T00:58:26+5:30

सिंचनाशिवाय शेती करणे ही संकल्पनाच करणे आता कठीण झाले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे वेळी अवेळी पाऊस गायब झाला आहे.

To lose crops without irrigation | सिंचनाअभावी पिके लागली करपायला

सिंचनाअभावी पिके लागली करपायला

कॅनलची दुरुस्ती केलीच नाही : धरणाचे पाणी खासगी कंपन्यांच्या घशात
प्रकाश काळे गोवरी
सिंचनाशिवाय शेती करणे ही संकल्पनाच करणे आता कठीण झाले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे वेळी अवेळी पाऊस गायब झाला आहे. त्यामुळे निसर्गाच्या पाण्यावर शेतकरी शेती पिकवू शकत नाही. जिल्ह्यात मोठे सिंचन प्रकल्प असतानाही त्याचा लाभ शेतकऱ्यांना होताना दिसत नाही. धरणाचे पाणी खासगी कंपन्यांच्या घशात गेल्याने सिंचनाअभाावी शेती सुकायला लागली आहे. पाटबंधारे विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले असून कॅनलची दुरुस्ती करण्यात न आल्याने शेतापर्यंत पाणी पोहोचणे कठीण झाले आहे.
जिल्ह्यात अमलनाला सारखे मोठे सिंचन प्रकल्प आहेत, असे सिंचन प्रकल्प शेतकऱ्यांसाठी वरदार ठरणारे आहे. परंतु सिंचन प्रकल्पाचे पाणी परिसरात असलेल्या सिमेंट कंपन्यांना पुरविल्या जात आहे. राजुरा- कोरपना तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प हरितक्रांतीचे स्वप्न पूर्ण करणारा आहे. या प्रकल्पांतर्गत पाचगाव, भूरकुंडा (बु.), उपरवाही, मंगी, भूरकुंडा (खु.), पांढरपवनी गावे येतात. येथील शेतकऱ्यांनी अमलनाला प्रकल्प अधिकाऱ्यांची भेट घेऊन पाणी सोडण्याची विनंती केली. मात्र कॅनल दुरुस्तीचे काम करायचे असून पाणी सोडण्यास उशीर होईल, असे सांगण्यात आले.
सध्या शेतपिकांना पाण्याची नितांत आवश्यकता आहे. जमिनीला भेगा पडल्याने शेतातील पीक करपायला लागले आहे. दुबार पेरणीने शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडला आहे. शेतीच्या रब्बी हंगामासाठी सुरुवात झाली आहे. परंतु रब्बी हंगामासाठी व पिकांना जगविण्यासाठी पाणी गरजेचे आहे. शेताजवळ कॅनल आहे. परंतु पाणी केव्हा येईल, या प्रतिक्षेत शेतकरी आहे.
कॅनलमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. काटेरी बाभळींनी अतिक्रमणही केले जात आहे. त्यामुळे पाणी सोडल्यानंतरही शेतापर्यंत पाणी पोहोचणार नाही. कॅनलची दुरुस्ती यापूर्वीच करणे गरजेचे होते. परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
शेतमालाला पाण्याची आवश्यकता आहे. त्यावेळेस शेतीला पाणी मिळाले पाहिजे, यासाठी संबंधित विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे होते. मात्र पिकांना पाण्याची आवश्यकता असतानाही अजूनपर्यंत शेतापर्यंत पाणी पोहोचले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पीक कसे घ्यायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतपिकांना पाणी मिळाले नाही तर शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत हाती आलेले पीक सुकून जाईल. मग सिंचन प्रकल्प असूनही त्यांचा काय फायदा, असा प्रश्न शेतकरी विचारु लागले आहते.
सिंचन प्रकल्पाने शेतीला तातडीने पाणी सुरू करावे, अशी मागणी पाचगाव येथील उपसरपंच गोपाल जांभुळकर, तिरुपती इंदूरवार, सुधाकर गेडेकर, दशरथ भोयर, दयाराम डोंगे, किसन पिंपळकर, रुपेश गेडेकर, दिनकर जीवतोडे, बाबुराव विरंदरे आदींनी केली आहे.

सिंचन प्रकल्प शेतीसाठी वरदान कसा ?
शेती आणि पाणी यांचे एक समीकरण जुळले आहे. निसर्गाची शेतीला साथ उरली नाही. पाण्याशिवाय शेतकरी उत्पादन घेऊ शकत नाही, हे वास्तव आज कुणीही नाकारु शकत नाही. जिल्ह्यात अंमलनाला, पकड्डीगुड्डम सारखे मोठे सिंचन प्रकल्प आहे. परंतु यातील बहुतांश पाणी खासगी सिमेंट कंपन्यांना पुरविल्या जाते. अजूनपर्यंत कॅलनची दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे सिंचन प्रकल्पाचे पाणी पोहोचणे कठीण झाले आहे.

शेतपिकांना सध्या पाण्याची निंतात गरज आहे. अमलनाला सिंचन प्रकल्पातून अजूनपर्यंत शेतीला पाणी सोडण्यात आले नाही. आम्ही १५-२० शेतकऱ्यांनी अंमलनाला प्रकल्प अधिकाऱ्यांची भेट घेऊन पाणी सोडण्याची मागणी केली. परंतु अजूनही कॅनलची दुरुस्तीच झाली नसल्याचे सांगण्यात आले असून पाण्याअभाावी शेतीपिके करपायला लागली आहेत.
- सुधाकर गेडेकर, शेतकरी, पाचगाव

Web Title: To lose crops without irrigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.