शेतकऱ्यांना पीक विम्याचा लॉलीपॉप
By Admin | Updated: May 29, 2015 01:44 IST2015-05-29T01:44:58+5:302015-05-29T01:44:58+5:30
नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत देता यावी, यासाठी कृषी पीक विमा योजना शासनाने सुरु केली आहे.

शेतकऱ्यांना पीक विम्याचा लॉलीपॉप
नांदाफाटा : नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत देता यावी, यासाठी कृषी पीक विमा योजना शासनाने सुरु केली आहे. यासाठी कर्जाच्या आधारावर राष्ट्रीयकृत बँकामधून शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जाच्या रकमेतून चार ते सहा हजार रुपये दरवर्षी विम्याच्या नावावर कपात करण्यात येत आहे. मात्र याचा कोणताही लाभ शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
अनेकदा शेतकऱ्यांना अतिवृष्टी, रोग, अळी, पूर आदींचा सामना करावा लागतो. यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मात्र कृषी विमा योजनेबद्दल शेतकऱ्यांना समाधानकारक माहिती मिळत नसल्याने बँक खात्यातून कपात करण्यात येत असलेल्या या पैशांचे काय, असा संभ्रम निर्माण झाला आहे.
यावर्षी राष्ट्रीयकृत बँकामार्फत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कर्जासाठी सातबाऱ्यावर अतिरिक्त बोजा चढविण्यात येत आहे. ज्यामुळे दरवर्षी शेतकऱ्यांना बोझा चढवायची गरज नसल्याचे दिसते. याउलट शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पैशातून विम्यासाठीचे पैसे कपात केल्यामुळे पाहिजे तेवढ्या कर्जाची रक्कम शेतकऱ्यांना मिळत नाही. अनेक शेतकऱ्यांचे कापूस, सोयाबीन धान, तूर यासारखी पिके नष्ट झाल्यानंतरही त्यांना विम्याची रक्कम मिळत नाही.
शासनाने अतिवृष्टी, दुष्काळ, पुरबुडी आदींचे पॅकेज शेतकऱ्यांना याआधी वाटप केले आहे. यात सरसकट वाटप करताना काही शेतकऱ्यांचे लाभार्थी यादीत नावे आली नाही. त्यामुळे अनेकांना या योजनांचा शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही. त्याचप्रमाणे पिकाचे नुकसान होऊनही पीक विम्याचे पैसे गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना मिळालेले नाही.
दरवर्षी चार ते सहा हजार रुपये कपात होत असल्याने आर्थिक नुकसानीचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. याबाबत बँकांमध्ये विचारणा केली असता काहीच न सांगता पैसे कपात करण्याचा शासनाचाच आदेश असल्याचे उत्तरे मिळत असल्याचे शेतकरी सांगतात. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. (वार्ताहर)