चंद्रपुरात पुन्हा लॉकडाऊन कडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 05:01 IST2020-07-18T05:00:00+5:302020-07-18T05:01:09+5:30
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी किंवा कोरोना आजाराचे लक्षणे जाण्यासाठी ७ ते १० दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळेच हा दहा दिवसांचा टाळेबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यातही ही एखाद्या या व्यक्तीला कोरोना संक्रमण झाले असल्यास पहिल्या चार ते पाच दिवसांमध्ये लक्षणे दिसायला लागतात. त्यामुळे पहिल्या टप्प्यात पाच दिवसांचा लॉकडाऊन कडकडीत करण्यात आला.

चंद्रपुरात पुन्हा लॉकडाऊन कडक
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्र्रपूर : कोरोनाचा संसर्ग होवू नये, यासाठी प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू असतानाही जिल्ह्यात गुरूवारपर्यंत कोरोना रूग्णांची संख्या २२८ झाली. त्यातील ६२ रूग्ण चंद्रपूर शहरातील आहेत. त्यामुळे धास्तावलेल्या प्रशासनाने चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्र तसेच ऊर्जानगर व दुर्गापूर ग्रामपंचायत हद्दीत शुक्रवारपासून रविवारी २६ जुलैपर्यंत १० दिवस कडक लॉकडाऊन लागू केले. परिणामी, गजबजणारे रस्ते पुन्हा निर्मनुष्य झाले आहेत. बाजारपेठा सुन्यासुन्या झाल्या. शहरातील चौकाचौकात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. दहा दिवसांचा हा लॉकडाऊन दोन टप्प्यात विभागण्यात आला आहे.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी किंवा कोरोना आजाराचे लक्षणे जाण्यासाठी ७ ते १० दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळेच हा दहा दिवसांचा टाळेबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यातही ही एखाद्या या व्यक्तीला कोरोना संक्रमण झाले असल्यास पहिल्या चार ते पाच दिवसांमध्ये लक्षणे दिसायला लागतात. त्यामुळे पहिल्या टप्प्यात पाच दिवसांचा लॉकडाऊन कडकडीत करण्यात आला. जिल्ह्यात १० दिवसात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या अचानक २०० पर्यंत पोहोचली. आता तर दिवसागणिक १० ते १२ पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे १० दिवसांचे कडक लॉकडाऊन करण्यात आले.
सर्व दुकाने कडकडीत बंद
जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार १७ ते २१ जुलै या पहिल्या पाच दिवसात चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्र, ऊर्जानगर व दुर्गापुरातील सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने बंद कडकडीत बंद ठेवण्यात आली. २१ ते २६ जुलै कालावधीत पुढील पाच दिवसांसाठी केवळ अत्यावश्यक व खाद्य वस्तूंची पुरवठा करणारी दुकाने, थोक विके्रते, जसे खाद्य पदार्थ, किराणा, दूध दुग्धजन्य पदार्थ, ब्रेड, फळे, भाजीपाला, अंडी, मांस,मासे, बेकरी, पशुखाद्य, कृषीविषयक दुकाने सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली. त्यामुळे फेरीवाले, भाजीविक्रेते, फळविक्रेत्यांसह सर्व व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवल्याचे शुक्रवारी दिसून आले.
शेतमालावर पुन्हा कुऱ्हाड
शहरातील सर्व हॉटेल्स घरपोच सुविधा आज बंद होती. २१ ते २६ जुलै या कालावधीत केवळ घरपोच सेवा सुरू राहणार आहे. भाजीपाला नाशवंत असल्याने दररोजविक्री करावीच लागते. मात्र, आजपासून पाच दिवस भाजीपाला विक्री बंद शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे
नागरिकांनी घरीच राहणे केले पसंत
गेले दोन दिवस पावसाने दमदार हजेरी लावली असताना आजपासून लॉकडाऊन सुरू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी गुरूवारी जीवनावश्यक वस्तुंची खरेदी केली. त्यामुळे बाजारात खरेदीसाठी झुंबळ उडाली होती. नागरिकांनी आज घरीच राहणे पसंत केले.
मनपाकडून अॅन्टिजेन टेस्ट मोहीम
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन सुरू होताच महानगर पालिकेकडून आरोग्य तपासणी मोहीम सुरू झाली. या कालावधीत काळातील दहा दिवसांमध्ये आरोग्य कर्मचारी घरोघरी जावून सर्वेक्षण करणार आहेत. कोरोना संसर्गाची तात्काळ माहिती देणाºया अॅन्टिजेन तपासणीचा यावेळी सर्वाधिक वापर केल्या जाणार आहे.
फक्त मेडिकल स्टोअर्स सुरू
जिल्हा प्रशासनाने सर्व मेडिकल स्टोअर्स सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजतापर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश दिले. त्यामुळे आज चंद्रपूर शहर व दुर्गापुरातील सर्व मेडिकल स्टोअर्स सुरू होते.
ऊर्जानगर, दुर्गापुरात शुकशुकाट
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू झाल्याने ऊर्जानगर व दुर्गापुरात शुकशुकाट पसरला होता. जीवनाश्यक वस्तुंची सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली. ऊर्जानगर व दुर्गापूर चौकात दररोज अनुभवाला येणारी कामगारांची गर्दी व वाहतूककोंडी आढळून आली नाही.
शासकीय कार्यालये, खासगी हॉस्पिटल सुरू
आज सकाळी सहा ते दहा वाजतापर्यंत काही विक्रेते घरपोच दूध वितरण केल्याचे दिसून आले. सर्व खासगी व सार्वजनिक वैद्यकीय सेवा, न्यायालय, राज्य व केंद्र शासन, स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये सुरू होती.