लिकर लॉबी पुन्हा मैदानात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 05:01 IST2020-06-23T05:00:00+5:302020-06-23T05:01:09+5:30
राज्यात भाजपची सरकार बसताच व सुधीर मुनगंटीवार मंत्री होताच १ एप्रिल २०१५ पासून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू करण्यात आली. यासाठी महिलावर्गाने मोठे आंदोलन उभारले होते. त्याचीच ही फलश्रुती होती. दारूबंदी लागू झाल्यानंतरही लिंकर संघटनांनी हार मानली नाही. मुंबई, दिल्लीपर्यंत या संघटनांनी वाऱ्या केल्या.

लिकर लॉबी पुन्हा मैदानात
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी सप्टेंबर महिन्यात उठविणार असल्याचे अनौपचारिक संकेत पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी देताच जिल्ह्यात या विषयावर आता जोरदार रणकंदन सुरू झाले आहे. दरम्यान, तब्बल सहा वर्षानंतर अचानक आशा पल्लवित झाल्याने जिल्ह्यातील लिंकर लॉबी पुन्हा मैदानात आली असून त्यांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.
राज्यात भाजपची सरकार बसताच व सुधीर मुनगंटीवार मंत्री होताच १ एप्रिल २०१५ पासून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू करण्यात आली. यासाठी महिलावर्गाने मोठे आंदोलन उभारले होते. त्याचीच ही फलश्रुती होती. दारूबंदी लागू झाल्यानंतरही लिंकर संघटनांनी हार मानली नाही. मुंबई, दिल्लीपर्यंत या संघटनांनी वाऱ्या केल्या. एवढेच नाही तर न्यायालयाचे दारही ठोठावले. मात्र न्यायालयाने राज्य शासनाच्या निर्णयावर हस्तक्षेप करण्यास नकार देत दारूबंदी कायम ठेवण्याचा निर्णय दिला. त्यानंतर मात्र लिंकर लॉबीचे आव्हान संपुष्टात आले. पाच वर्ष दारूबंदी कायम राहिली.
दरम्यान, जिल्ह्यात दारूबंदी असताना अवैध दारूचा महापूर आहे. बोगस दारूमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दारूबंदीमुळे शासनाचा महसूल बुडत आहे. जिल्ह्यातील दारूबंदी उठवायची होती. परंतु सध्यास्थितीत कोरोना महामारी असल्याने दारूबंदी उठविण्यास विलंब होत आहे. आपण कोणत्याही आंदोलनाला घाबरणार नाही. येत्या सप्टेंबर महिन्यात चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविणार असल्याचे अनौपचारिकरित्या सूतोवाच ना. वडेट्टीवार यांनी चिमुरात दोन दिवसांपूर्वी केले. ना. वडेट्टीवार यांच्या या वक्तव्यामुळे आतापर्यंत तलवार मॅन करून बसलेली लिंकर लॉबी पुन्हा मैदानात आली आहे. कागदपत्रांची पडताळणी करीत वरिष्ठ पातळीवर मोर्चेबांधणीत ही लॉबी सध्या व्यस्त दिसत आहे.
बारच्या जागेवर हॉटेल्स
दारूबंदी लागू झाल्यानंतर जिल्ह्यात सर्व बिअर बार, वाईन शॉपला टाळे लागले. काही महिन्यांपर्यंत ते तसेच होते. मात्र दारूबंदी उठविण्यात न आल्याने अनेकांनी बिअर बारच्या जागेवर कोणताही बदल न करता हॉटेल्स सुरू केले. आज ना उद्या दारूबंदी उठेल या आशेवरच त्यांनी बिअर बारची इतर व्यवसायासाठी तोडफोड केली नसावी, असेच दिसून येते.
निवडणुकीतही गाजला मुद्दा
लोकसभा निवडणुकीत चंद्रपूरच्या दारूबंदीचा मुद्दा चांगलाच गाजला होता. यावर मोठ्या प्रमाणात रणकंदन झाले. त्यानंतर काही महिन्यातच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही चंद्रपूरच्या दारूबंदीवर चर्चा झाली. एवढेच नव्हे तर उमेदवारांच्या भाषणांमधून दारूबंदीवर वक्तव्ये झालीत. यातून मतदारांचा कानोसा घेण्यात आला होता.