अल्ट्राटेक चौकात गतिरोधक उभारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:12 AM2021-01-24T04:12:43+5:302021-01-24T04:12:43+5:30
स्वच्छतागृहांचा लक्ष्यांक वाढवावा पोंभुर्णा : गाव, शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न सुरू आहेत, मात्र अजूनही यश आले नाही. तालुक्यातील ...
स्वच्छतागृहांचा लक्ष्यांक वाढवावा
पोंभुर्णा : गाव, शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न सुरू आहेत, मात्र अजूनही यश आले नाही. तालुक्यातील ग्रामीण भागात उघड्यावर शौचास जाणारे अनेक जण आढळतात. त्यामुळे स्वच्छतागृहाचा लक्ष्यांक वाढविण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
तहसील कार्यालयातील रिक्त पदे भरा
चंद्रपूर : जिल्ह्यातील तहसील कार्यालयात अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या गतिमानतेवर अनिष्ट परिणाम झाला. कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी कार्यालयात येतात. परंतु, कार्यालयातील महत्त्वाची पदे रिक्त आहेत. त्यामुळे प्रशासनाने यासंदर्भातील प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
कचरा टाकल्यास कारवाई करा
चंद्रपूर : विठ्ठल मंदिर वाॅर्डात काही ठिकाणी मोकळ्या जागेवर कचरा टाकला जात आहे. कचराकुंड्या असतानाही हा प्रकार घडत आहे. मोकाट जनावरांमुळे कचरा नाल्यांमध्ये जाऊन तुडुंब भरल्या आहेत. घाणीमुळे रोगराई पसरू शकते. त्यामुळे मनपाने स्वच्छता कर्मचाऱ्यांना तातडीने वाॅर्डात पाठवावे व रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी महिलांनी केली आहे.
नवरगाव-सिंदेवाही रस्त्यावर खड्डे
सिंदेवाही : नवरगाव ते सिंदेवाही रस्ता अरुंद आहे. त्यातही रस्त्याच्या कडेला मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघाताच्या घटनात वाढ झाली आहे. त्यामुळे रस्त्यातील खड्डे बुजविण्यात यावे, अशी मागणी सामाजिक युवा ब्रिगेड संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
अंधारी, उमा नदीला घाणीचा विळखा
मूल : अंधारी, उमा, शिरना, इरई, झरपट आदी नद्या बारमाही वाहतात. परंतु या नद्या प्रदूषित झाल्या आहेत. नद्यांच्या स्वच्छतेकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. काही पर्यटक नदीचे पाणी बघण्यासाठी येत असतात. पण नदीत घाण पसरल्यामुळे पर्यंटकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.
सैराट वाहनचालकामुळे नागरिक त्रस्त
मूल : येथील विश्रामगृह मार्गावर मागील अनेक दिवसांपासून काही युवक सैराटपणे वाहन पळवीत आहेत. याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या मार्गावर मोठ्या प्रमाणात रहदारी असते.
पाईप लाईनचे काम निकृष्ट दर्जाचे
मूल : तालुक्यातील येरगाव येथे नव्याने टाकण्यात आलेल्या पाईपलाईनच्या कामात अनियमितता आहे. तसेच ठरावाला न जुमानता काम केल्याने निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा आरोप येरगाव येथील नागरिकांनी केला आहे. यासंदर्भात संवर्ग विकास अधिकाऱ्यांकडे तक्रारही करण्यात आली आहे.
गंजवाॅर्ड परिसरातील रस्त्यावर दुर्गंधी
चंद्रपूर : येथील गंजवाॅर्ड परिसरातील रामाळा तलावाशेजारी असलेल्या चौकामध्ये कचरा टाकत असल्याने रस्त्यावर दुर्गंधी पसरली आहे. आता काही दिवसातच महाविद्यालये सुरू होणार असून, या रस्त्यावरून मोठ्या संख्येने विद्यार्थी जातात. मात्र दुर्गंधीमुळे त्यांना त्रास सहन करावा लागणार आहे. महानगरपालिकेने याकडे विशेष लक्ष देऊन नियमित कचरा साफ करावा, अशी मागणी होत आहे.
विदर्भा नदीच्या पाणी पातळीत घट
कोरपना : यवतमाळ जिल्ह्यातील घोन्सा परिसरातील कोळसा खाणीमुळे विदर्भा नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय घट होत आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात या प्रवाहात पाण्याचे दुर्भिक्ष उद्भवण्याचे चिन्ह आहे. त्यामुळे पाणी संवर्धनाच्या उपाययोजना होणे अत्यंत गरजेच्या आहेत.