प्रमुख अधिकाऱ्यांचाच मुख्यालयाला खो
By Admin | Updated: December 18, 2014 22:52 IST2014-12-18T22:52:46+5:302014-12-18T22:52:46+5:30
आदिवासीबहुल, अतिदुर्गम, नक्षलग्रस्त व अतिशय मागास समजल्या जाणाऱ्या कोरपना तालुक्यातील प्रशासकीय व निमशासकीय कार्यालयांचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहत

प्रमुख अधिकाऱ्यांचाच मुख्यालयाला खो
चंद्रपूर : आदिवासीबहुल, अतिदुर्गम, नक्षलग्रस्त व अतिशय मागास समजल्या जाणाऱ्या कोरपना तालुक्यातील प्रशासकीय व निमशासकीय कार्यालयांचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने कामांचा खोळंबा होत आहे. वरिष्ठांनी अनेकदा बजावूनही हे कर्मचारी व अधिकारी वरिष्ठांच्या आदेशाला जुमानत नसल्याचे चित्र कोरपना तालुक्यात आहे.
कोरपना तालुक्यात ११३ गावे, ५३ ग्रामपंचायती व एक नगर परिषद आहे. तहसिलदार, ठाणेदार हे दोनच अधिकारी वगळता संपूर्ण कार्यालयाचे प्रमुख ‘अपडाऊन’च करणे पसंद करीत आहेत. सद्य:स्थितीत उपकोषागार, दुय्यम निबंधक, सहाय्यक निबंधक कार्यालय, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, एकात्मिक बालविकास अधिकारी कार्यालय, कृषी उत्पन्न बाजार समिती आदी कार्यालयांचे प्रमुख अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. यासोबतच येथे असलेल्या तहसिल भूमी अभिलेख, पंचायत समिती, उपकोषागार कार्यालय, कृषी उत्पन्न बाजार समिती, दुय्यम निबंधक, एकात्मिक बालविकास प्रकल्प, जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शासकीय व निमशासकीय शाळांतील कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने येथील कार्यालयीन वेळ १२ वाजता पासूनच सुरू होते.
कोरपना तालुक्याचे स्थळ असले तरी प्राथमिक सुविधांच्या दृष्टीने अद्यापही परिपूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे बहुतांश अधिकारी व कर्मचारी येथे राहायला तयार नाही. शासकीय सदनिकांमध्ये कोणत्याही सुविधा नसल्याने कर्मचारी, अधिकारी या सदनिकांमध्ये राहणे टाळत आहेत. त्यामुळे लाखो रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या या सदनिका ओस पडल्या आहेत.
या तालुक्याच्या ठिकाणावरुन दळणवळणाची साधने अत्यल्प आहेत. पाल्यांसाठी शैक्षणिकदृष्ट्या या तालुक्यात पोषक वातावरण नाही. त्यामुळे कोरपनाबद्दल नकारार्थी भाव कर्मचाऱ्यांत आहे. उदरनिर्वाहासाठी नोकरी गरजेची असल्याने कर्मचाऱ्यांपुढे या खेरीज पर्याय नाही. येथील कर्मचारी चंद्रपूर, राजुरा, वरोरा, वणी, भद्रावती, बल्लारपूर, गडचांदूर आदी सोयींच्या ठिकाणांवरुन नियमित ‘अपडाऊन’ करताना दिसतात. दूरगावावरून कामासाठी आलेले नागरिक यात भरडले जात आहेत. एका दिवसांत होणारी कामे १५-१५ दिवस लोटूनही होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे कार्यालयात कामासाठी येणाऱ्या नागरिकांची गर्दी वाढते. कामाची गतीही संथ असल्याने गरजवंतांना मनस्ताप सहन करावा लागतो. प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने तालुक्याचे स्थळ विकसित नसल्याने अनेक कार्यालये येथे नाहीत. त्यामुळे इतर ठिकाणी जाऊन कामे नागरिकांना करावी लागते. यात वेळेचा अपव्यय होतो. सोबतच आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागतो. हाती असलेले काम टाकून विनाकारण गैरसोयीच्या सामना करावा लागतो. (प्रतिनिधी)