नरेश पुगलियांचे पोलीस अधीक्षकांना पत्र
By Admin | Updated: September 6, 2015 00:53 IST2015-09-06T00:53:36+5:302015-09-06T00:53:36+5:30
रोहीत बोथरा मारहाण प्रकरणी सखोल चौकशी करून संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, ...

नरेश पुगलियांचे पोलीस अधीक्षकांना पत्र
चंद्रपूर : रोहीत बोथरा मारहाण प्रकरणी सखोल चौकशी करून संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार नरेश पुगलिया यांनी एका पत्राद्वारे चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांच्याकडे केली आहे.
सराईत गुंडांना थर्ड डिग्री देण्याचा पोलीस खात्याचा प्रघात आहे. मात्र निरपराध सामान्य नागरिकाला बेदम मारहाण करून उलट त्याच्यावरच गुन्हे दाखल करणे, हे कशाचे द्योतक आहे, असा सवाल नरेश पुगलिया यांनी पत्रातून उपस्थित केला आहे. जनता व पोलीस यांच्या सामंजस्याचे व सलोख्याचे संबंध असताना पोलिसांच्या अशा उर्मट वर्तनाचा चंद्रपूर शहरातील सामान्य जनता व व्यापाऱ्यांनी निषेध नोंदविला आहे. आपल्या शब्दावर विश्वास ठेऊन व्यापाऱ्यांनी आपला बंद मागे घेतला. त्यामुळे उर्मट अधिकारी व कर्मचाऱ्यांवर आपणाकडून कारवाई केली जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र आपण मारहाण करणाऱ्या कर्मचाऱ्यांची केवळ बदली केली. आणि चौकशीचे आदेश दिले. परंतु प्रकरणाचे गांभिर्य ओळखून त्यांना निलंबित करून त्यांची चौकशी करता आली नसती का, असा सवालही त्यांनी पत्रातून उपस्थित केला.
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीनंतर या निर्णयाला गालबोट लावण्याचे कार्य काही पोलीस अधिकारी व कर्मचारी करीत असल्याचा आरोप पुगलिया यांनी पत्रातून केला आहे.पूर्वी जिल्ह्यात ४०० ते ५०० देशी-विदेशी दारूची दुकाने होती. परंतु बंदीनंतर जवळपास पाच हजार लोक अवैध दारू विक्रीच्या व्यवसायात गुंतले असल्याचा दावाही पुगलिया यांनी पत्रातून केला आहे. या अवैध दारू विक्रीचा लहान मुलांच्या मनावर विपरित परिणाम होत असून आर्थिक व्यवहारही वाढले असल्याचे पुगलिया यांनी म्हटले आहे. रोहीत बोथरा मारहाण प्रकरण अतिशय गंभीर असून सामान्य नागरिक व पोलिसांमध्ये मोठी दरी निर्माण करणारी ही घटना असल्याने या प्रकरणात आपण न्याय द्यावा, अन्यथा न्यायासाठी मानवाधिकार अथवा उच्च न्यायालयात जाण्याचा इशाराही पुगलिया यांनी पत्रातून दिला आहे. (प्रतिनिधी)