सीमावर्ती गावात मलेरियाचे तांडव सुरूच

By Admin | Updated: October 17, 2015 01:35 IST2015-10-17T01:35:02+5:302015-10-17T01:35:02+5:30

गेल्या पंधरवड्यात सीमावर्ती गावांमध्ये मलेरियाने चार जणांचा बळी गेल्यानंतर पुन्हा गुरुवारी पहिल्या वर्गात विद्यार्थिनीसोबतच एका महिलेचा मलेरिया आजाराने मृत्यू झाला.

Launch of malaria in the border town | सीमावर्ती गावात मलेरियाचे तांडव सुरूच

सीमावर्ती गावात मलेरियाचे तांडव सुरूच

आणखी दोघांचा मृत्यू : आरोग्य यंत्रणेचा एकही कर्मचारी फिरकला नाही
संघरक्षित तावाडे जिवती
गेल्या पंधरवड्यात सीमावर्ती गावांमध्ये मलेरियाने चार जणांचा बळी गेल्यानंतर पुन्हा गुरुवारी पहिल्या वर्गात विद्यार्थिनीसोबतच एका महिलेचा मलेरिया आजाराने मृत्यू झाला. एकीकडे या परिसरातील गावांमध्ये मलेरियाचे तांडव सुरू असताना दुसरीकडे आरोग्य यंत्रणा मात्र या विषयात अद्याप गंभीर झाली नाही. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सोनी ज्ञानोबा तेलंगे (७) ही गेल्या आठवडाभरापासून हिवतापाने आजारी होती. तिला गुरुवारी १५ आॅक्टोबरला जिवती येथील दवाखान्यात आणत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला, तर सत्यभामा नारायण मोहाळे (५५) या महिलेचा दोन दिवसाअगोदर मृत्यू झाला. या दोघीही कोटा येथील रहिवासी आहेत.
सीमेवरील कोटा, शंकरलोधी, परमडोली आणि मुकदमगुडा या चारही गावात मलेरियाने गेल्या एक महिन्यापासून मलेरियाचे थैमान सुरू आहे. शंकरलोधी येथील आशिद सुधाकर काटे, मुकदमगुडा येथील दुसऱ्या वर्गात शिकणारा भिमज्योत प्रकाश खंदारे तर कोटा येथील मुद्रिकाबाई नारायण मोरे व दिगांबर नागनाथ गोपले या चौघांचा यापूर्वी ंहिवतापाने मृत्यू होता. त्यानंतरही आरोग्य विभागाने कुठल्याही ठोस उपाययोजना सुरू न केल्याने गावात मृत्युचे तांडव सुरू आहे.
या भागातील प्रत्येक घरात दोनपेक्षा अधिक मलेरियाचे रुग्ण आहेत. मात्र आरोग्य यंत्रणा अजुनही या गावात पोहचली नाही. २ आॅक्टोबरला यासंदर्भात लोकमतने ‘वादग्रस्त सीमावर्ती गावात मलेरियाचा कोप’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. मात्र तरीही आरोग्य यंत्रणेला जाग आली नाही. गंभीर बाब ही की, एकाही लोकप्रतिनिधीने या गावांमध्ये जाऊन साधी भेटही दिली नाही.
महाराष्ट्र-तेलंगाणा राज्याच्या सीमेवरील वादग्रस्त गावांतील आम्ही रहिवासी असल्यामुळे आमच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही, असा संताप हे गावकरी व्यक्त करीत आहेत. येथील लोकांच्या डोळ्यातील अश्रू गेल्या महिन्याभरापासून कोणी पुसण्याचा साधा प्रयत्नही कुणी केला नाही.
कोटा या गावात महिन्याभरात चार जीवांचा बळी गेल्याने संपूर्ण गाव तणावाखाली आहे. घरातील प्रत्येकाला आजाराने घेरले असून या लोकांची रक्त किंवा इतर कोणतीही तपासणी करण्यात आलेली नाही. एकूणच आरोग्य विभागाबाबत संताप व्यक्त होत आहे.

प्रत्येक घरात रुग्ण
कोटा, शंकरलोधी, परमडोली आणि मुकदमगुडा गावांना प्रत्यक्ष भेट दिली असता, गावातील घराघरांत रुग्ण पाहायला मिळणार. तेलंगणाचे काही खाजगी डॉक्टर या गावात येऊन रुग्णांवर उपचार करतात, पण महाराष्ट्राचे डॉक्टर अजूनही फिरकले नाहीत. लहानापासून तर मोठ्यांपर्यंत प्रत्येक गावात रुग्ण पाहायला मिळतील.

अजून किती जणांच्या मृत्यूची प्रतीक्षा?
सीमेवरील कोटा या गावात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला. अशा कठीण परिस्थितीत आरोग्य यंत्रणेचे दुर्लक्ष असल्याने प्रशासन आणखी किती जणांचा बळी जाण्याची प्रतीक्षा करीत आहे, असा संतप्त सवाल गावकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

मृत सोनीबाईची बहीणही मलेरियाग्रस्त
१५ आॅक्टोबरला सोनीबाई ज्ञानोबा तेलंगे या पहिल्या वर्गातील मुलीचा वाटेतच मृत्यू झाला. तिची लहान बहीण शिल्पा ज्ञानोबा तेलंगे ही चार वर्षांची मुलगीसुद्धा मलेरियाने आजाराने ग्रस्त आहे. मोठ्या मुलीचा मृत्यू झाल्याने आईवडील भांबावले आहेत. अशावेळी आरोग्य विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे.

गावकऱ्यांनी मानले ‘लोकमत’चे आभार

महाराष्ट्र आणि तेलंगाणा राज्याच्या कचाट्यात ही गावे सापडली असून याकडे दोन्ही राज्याचे नेहमी दुर्लक्ष राहिले आहे. आरोग्य, रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, जमिनीचे पट्टे या सर्व समस्या भेडसावत असताना तसेच मलेरियाने रुग्ण दगावत असताना दोन्ही राज्य बघ्याची भूमिका घेतात अशावेळी ‘लोकमत’ने आमची बाजू, समस्या या नेहमी आपल्या वृत्तपत्रात छापून सरकारी यंत्रणेसमोर मांडल्या. त्यामुळे गावकऱ्यांनी ‘लोकमत’चे आभार मानले.

कर्मचारी पाठविल्याचा दावा
सीमावर्ती गावात मलेरियाचे तांडव सुरू असले तरी येथील वैद्यकीय अधिकारी के.वाय. कोरडे यांचे याकडे पुर्णत: दुर्लक्ष होत आहे. प्रस्तुत प्रतिनिधीने १५ दिवसांअगोदर येथील मलेरियाच्या आजाराविषयी त्यांना माहिती दिली, असता या गावात तेलंगणाचे आरोग्य पथक काम करत असल्यामुळे आम्ही जाऊ शकलो नाही, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या या बोलण्यातून ते किती कर्तव्यदक्ष आहेत, हे लक्षात येते.

हिवतापाची बालकांमध्ये लागण अधिक

महिनाभरात मलेरियाचे सहा बळी गेले असून त्यात चार बालकांचा समावेश आहे. कोटा या गावात या आजाराची लागण घरोघरी असून यात विद्यार्थी जास्त आहेत. शिल्पा ज्ञानोबा तेलंगे (४), आस्ती बाबू मवाळे (१०), प्रियंका माधव तेलंगे (१२), प्रणय व्यंकटी कोटंबे (५), दिलीप माधव तेलंगे (१५) या बालकांचा समावेश आहे तर इथेच दिनानाथ गवाले (३०), कौशल्याबाई तेलंगे (५०), नागनाथ गायकवाड (४५) यांनाही लागण झाली आहे.

Web Title: Launch of malaria in the border town

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.