अखेरचा प्रवासही होतो येथे त्रासदायक !
By Admin | Updated: March 1, 2015 00:44 IST2015-03-01T00:44:44+5:302015-03-01T00:44:44+5:30
चंद्रपूर-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर वसलेल्या व तालुक्याचे ठिकाण असलेल्या सिंदेवाही नगराची अत्यंत दुर्दशा झाली आहे.

अखेरचा प्रवासही होतो येथे त्रासदायक !
सिंदेवाही : चंद्रपूर-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर वसलेल्या व तालुक्याचे ठिकाण असलेल्या सिंदेवाही नगराची अत्यंत दुर्दशा झाली आहे. अंदाजे २५ हजार लोकसंख्या असलेल्या या नगरातील जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेल्या अनेक समस्या व विकासाची कामे रेंगाळत आहे.
मनुष्य समाज जीवनात वावरत असताना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. आयुष्याच्या शेवटच्याक्षणी इहलोकाची यात्रा सुखाची जावी अशी सर्वाची अपेक्षा असते. परंतु सिंदेवाही येथील स्मशानभूमीत उघड्यावरच अंत्यसंस्काराचा विधी पार पाडावा लागत आहे. स्वातंत्र्यानंतरही सिंदेवाही नगरात अद्यापही समस्या कायम आहेत. तालुक्याचे ठिकाण असलेले येथील स्मशानभूमी पाच वर्षापासून केवळ देखावा ठरलेली आहे. या स्मशानभूमीतील शवदाहिनी पाच वर्षापासून बेपत्ता आहे. तसेच टिन शेड दोन वर्षापासून तुटलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे पावसाळ्यात टिन शेडमधून पाणी गळते. सद्य:स्थितीत स्मशानभूमीवरील तुटलेल्या टिन गायब झाल्या आहे. आता केवळ लोखंडी खांब उभे आहेत. अशा प्रतीकुल परिस्थितीत नागरिकांना उघड्यावरच अंत्यसंस्काराचा विधी पार पाडवा लागत आहे. स्मशानभूमी परिसराला संरक्षक भिंत नाही. स्मशानभूमीत वीज व्यवस्था नाही, त्यामुळे रात्रीच्या वेळी अंत्यसंस्कार करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. स्थानिक प्रशासनाने या स्मशानभूमीत शवदाहिनी व टिन शेड लावण्याचे सौजन्य दाखविले नाही. शासन जनतेच्या विकासासाठी वर्षानुवर्षे लाखो रुपये खर्च करीत असले तरी गावाचा विकास मात्र होत नसल्याचे दिसून येते. या स्मशानभूमीत शवदाहिनी व शेडवर टिनाची नवीन पत्रे बसविणे, विद्युत व्यवस्था, स्मशानभूमीवरील जागेवरचे अतिक्रमण हटविणे तसेच शोकसभा घेण्याकरिता सभागृह बांधणे अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. (तालुका प्रतिनिधी)