क्षुल्लक कारणांमुळे कोल्हापुरी बंधारे निकामी

By Admin | Updated: May 31, 2015 01:56 IST2015-05-31T01:56:29+5:302015-05-31T01:56:29+5:30

जलयुक्त शिवार अभियान ही नव्या सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेची कडक आणि जलदगतीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.

KOLHAPURI BORDES | क्षुल्लक कारणांमुळे कोल्हापुरी बंधारे निकामी

क्षुल्लक कारणांमुळे कोल्हापुरी बंधारे निकामी

चंद्रपूर : जलयुक्त शिवार अभियान ही नव्या सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेची कडक आणि जलदगतीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. यातून पाण्याचे नियोजन व व्यवस्थापन करण्यावर विशेष लक्ष देण्यात येत आहे. तसेच जुन्या बंधाऱ्यांना पुनरुज्जीवित करून लाखोंची उधळपट्टी रोखण्यावर भर देण्यात येत आहे. मात्र जिल्हा परिषद सिंचन विभाग जुन्या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करीत नवीन बंधाऱ्यांच्या बांधकामासाठी कोट्यवधींचा निधी खर्च करीत आहे. मात्र हे बांधलेले कोल्हापुरी बंधारे क्षुल्लक किंमतीच्या लोखंडी प्लेटअभावी निकामी पडले आहेत.
विशेष म्हणजे, या विभागाकडे साध्या प्लेट खरेदी करण्यासाठीही निधी नाही. पण नवीन कोल्हापुरी बंधारे बांधण्यासाठी लाखोंचा निधी उपलब्ध असल्याचे दिसून येत आहे. राजुरा तालुक्यात असाच आणखी एक कोल्हापुरी बंधारा बांधण्यात येत असून हा बंधारादेखील शोभेची वास्तू ठरण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषद सिंचन विभाग राजुरा कार्यालयाने तालुक्यात १०० च्या वर कोल्हापुरी बंधाऱ्यांची निर्मिती केली आहे. या बंधाऱ्यातून पाण्याच्या पातळीत वाढ होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्यास मदत होईल, असा हेतू होता. पण, आजच्या स्थितीत या बंधाऱ्याची दुरवस्था झाली आहे.
सद्यस्थितीत या बंधाऱ्याच्या लोखंडी प्लेट चोरी गेल्या आहेत. त्यामुळे या बंधाऱ्यात पाणीच राहत नाही. केवळ लोखंडी प्लेटअभावी हे बंधारे निकामी ठरले आहेत. विहीरगाव, भुरकुंडा, गोवरी, लक्कडकोट, मारडा, सिंधी, पाचगाव यासह इतर गावालगतच्या नाल्यांवर बांधलेले कोल्हापुरी बंधारे शेवटच्या घटका मोजत आहेत. परंतु या बंधाऱ्यांना पुनरुज्जीवित करण्यासाठी अत्यल्प किंमतीच्या प्लेटसाठी पैसा नाही. पण, लाखो रुपयांच्या नवीन कोल्हापुरी बंधाऱ्यांची निर्मिती केली जात आहे.(शहर प्रतिनिधी)

Web Title: KOLHAPURI BORDES

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.