बेरोजगारांची कामासाठी केविलवाणी धडपड

By Admin | Updated: April 25, 2015 01:31 IST2015-04-25T01:31:14+5:302015-04-25T01:31:14+5:30

ताडाळी एमआयडीसी येथील आस्थापनांमध्ये आपल्यालाही नोकरी मिळेल, या आशेवर जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील बरेचसे तरूण आस्थापनांमध्ये आपला ‘बायोडाटा’ देत असतात.

Kevilani Dhadpad for unemployed workers | बेरोजगारांची कामासाठी केविलवाणी धडपड

बेरोजगारांची कामासाठी केविलवाणी धडपड

वतन लोणे घोडपेठ
ताडाळी एमआयडीसी येथील आस्थापनांमध्ये आपल्यालाही नोकरी मिळेल, या आशेवर जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील बरेचसे तरूण आस्थापनांमध्ये आपला ‘बायोडाटा’ देत असतात. मात्र परिसरातील उद्योगांच्या बिकट अवस्थेमुळे फक्त मोजक्याच तरूणांना या ठिकाणी काम करण्याची संधी मिळते. मात्र बऱ्याच उच्चशिक्षित तरूणांना नोकरी न मिळाल्यामुळे त्यांची निराशा होत आहे.
तांत्रिक शिक्षण घेतलेल्या तरूणांची संख्या जिल्ह्यात लाखोंच्या घरात आहे. दरवर्षी तांत्रिक पदवी घेवून पास होणाऱ्या तरूणांची संख्या या संख्येमध्ये भरच घालत असते. महिन्याकाठी ताडाळी एमआयडीसी मध्ये नोकरीसाठी बायोडाटा देणाऱ्या तरूणांची संख्या पाचशेच्या आसपास आहे. मात्र इंजीनियरिंगमध्ये पदविका असूनही तरूणांना एक नोकरी मिळविण्यासाठी देखील केविलवाणी धडपड करावी लागत असल्याचे चित्र आहे.
पालक मुलांना लाखो रूपये खर्च करून अभियांत्रिकीच्या पदविकेचे शिक्षण देतात. मुलगा चांगल्या पगारावर नोकरीला लागावा ही प्रत्येक पालकाची इच्छा असते. त्यामुळे मुलाच्या शिक्षणासाठी स्वत:च्या इच्छांना मारून प्रसंगी पैसे कर्जाने काढून पालक मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण देतात. मात्र मुलांचे शिक्षण पुर्ण झाल्यावर मुलांना नोकरी मिळविणे खुप कठीण झाले आहे.
मनासारखी नोकरी मिळाल्यावर आपले राहणीमान उंचावेल असे बऱ्याचशा अभियांत्रिकी किंवा तत्सम शिक्षण घेतलेल्या तरूणांचे स्वप्न असते. तसेच नोकरी मिळाल्यानंतर लग्न करून जीवन मजेत घालवायचे, असे प्रत्येक तरूणांचे स्वप्न असते. मात्र जिल्ह्यातील एमआयडीसी मध्ये नोकऱ्या उपलब्ध नसल्यामुळे जिल्ह्यातील तरूणांची निराशा होत आहे. त्यातच नोकरी नसलेल्या तरूणांना लग्नासाठी मुलीच कुणी देत नसल्यामुळे तरूणांचे सुखी संसाराचे स्वप्नही भंग होण्याच्या मार्गावर आहे.
उद्योगांचा जिल्हा म्हणून चंद्रपूर जिल्ह्याला ओळखले जात असले तरी या जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांची रोजगारासाठी हेळसांडच होत आहे. परप्रांतीय युवकांना संधी दिली जाते. तर स्थानिकांना डावलले जाते, हा नेहमीचाच अनुभव आहे. त्यामुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या उद्योग प्रशासनाप्रती युवकांमध्ये असंतोष पसरला आहे. तक्रार करूनही फायदा होत नसल्याने हताश झालेले युवक विविध मार्गाकडे वळत असून काहींनी उच्च शिक्षण घेऊनही पानटपरी व्यवसाय करीत आहेत.
महाराष्ट्रात प्रदुषणाच्या बाबतीत चंद्रपूर जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. तसेच देशात प्रदूषणाच्या बाबतीत चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यात जानेवारी २०१० पासून नव्या उद्योगांना बंदी घालण्यात आली आहे. याचे फलित म्हणून जिल्ह्यातल्या प्रदूषणात घट झाली असून आता चंद्रपूर जिल्हा प्रदूषणाच्या बाबतीत देशात सहाव्या क्रमांकावर आला आहे. हा बदल स्वागतार्ह आहे. मात्र बेरोजगारीच्या प्रश्नावरही शासनाने लवकरात लवकर उपाय शोधण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र गेल्या दोन तीन वर्षात शासनाकडून कोणत्याही उपाययोजना झालेल्या नाही.

Web Title: Kevilani Dhadpad for unemployed workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.