कारगीलच्या आठवणी रोमांच उभे करतात...
By Admin | Updated: July 26, 2015 01:36 IST2015-07-26T01:36:05+5:302015-07-26T01:36:05+5:30
‘सर्व बाजूंनी पसरलेला बर्फ, प्रतिकूल हवामान, उंचावरुन होत असलेला शत्रूचा मारा आणि या साऱ्याला तोंड देत प्रखर देशभक्तीने ओतप्रोत भरलेले भारतीय सैनिक. ..

कारगीलच्या आठवणी रोमांच उभे करतात...
चंद्रपूर : ‘सर्व बाजूंनी पसरलेला बर्फ, प्रतिकूल हवामान, उंचावरुन होत असलेला शत्रूचा मारा आणि या साऱ्याला तोंड देत प्रखर देशभक्तीने ओतप्रोत भरलेले भारतीय सैनिक. शत्रूला या भूमीवर पायही ठेवू द्यायचा नाही, या निर्धाराने पुढे सरसावतात, एकक ठाणं काबीज करत विजयी होतात, हे दृश्य आजही आठवते आणि त्या साऱ्या आठवणी अंगावर रोमांच उभे करतात, देशासाठी सर्वस्व बहाल करण्याची उर्मी वारंवार जागी करतात’ सन्मित्र सैनिकी विद्यालयाचे सैनिकी प्रशिक्षक तथा मुख्य प्रशिक्षण अधिकारी कमलसिंग थापा बोलत होते. बोलताना त्यांच्या शब्दातून कारगिल युद्धाचा थरार स्पष्ट जाणवत होता.
२६ जुलै रोजी कारगील दिन आहे. या निमित्ताने प्रस्तुत प्रतिनिधीने त्यांची भेट घेतली. यावेळी युध्दातील थरारक आठवणींना या योध्दांनी उजाळा दिला.
१९९९ च्या कारगील युद्धात प्रत्यक्ष सहभागी असलेले कमलसिंग थापा युद्धाच्या आठवणी सांगताना म्हणाले, ‘मी त्यावेळी नायब सुभेदार होतो. पॉईट ४८७५ वर चढाई करण्याचा आम्हाला आदेश मिळाला. शत्रूसैन्य सतत फायरिंग करत होते. त्यांना तसेच प्रत्यूत्तर देत आम्ही चढाई करत होतो. उंचावरुन लढणे त्यांना जेवढे सोपे तेवढेच आम्हाला कठीण होते. पण अशा प्रतिकूल परिस्थितीचा सामना करीत आम्ही शत्रूला परास्त केले व ती जागा सर केली. या लढाईत प्रत्यक्ष सहभागी होण्याची संधी मिळणे हे मी माझे सौभाग्य समजतो.’
कमलसिंग थापा हे मूळचे हिमाचल प्रदेशचे असून सैन्यातून निवृत्त झाल्यावरही देशसेवेचे माध्यम म्हणून येथील सन्मित्र सैनिकी विद्यालयात सैनिकी प्रशिक्षक या पदावर ते रुजू झाले. भारतीय वायुसेनेतून निवृत्त झालेले दीपक भोयर हेसुद्धा सन्मित्र सैनिकी विद्यालयात सैनिकी प्रशिक्षण म्हणून कार्यरत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातले ब्रह्मपुरी हे त्यांचे मूळ गाव. कारगील युद्धप्रसंगी त्यांची श्रीनगर येथे नेमणूक होती. लढाऊ विमानांची निगा राखणे, काळजी घेणे व लढाईच्या दृष्टीने लढाऊ विमानांची सिद्धता करणे ही महत्त्वाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. वायुदलाची या युद्धात महत्त्वाची भूमिका होती. अत्यंत जोखमीची ही जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. या युद्धात सामील होता आले, याचे त्यांनाही समाधान वाटते. युद्धाच्या वेळी वायुसेनेत ते सार्जंट या पदावर कार्यरत होते.
दीपक भोयर व कमलसिंग थापा दोघांनीही निवृत्तीनंतर देशसेवा करता यावी म्हणून सन्मित्र सैनिकी विद्यालयात सैनिकी प्रशिक्षक म्हणून कार्य करणे पसंत केले. उद्याचे सैनिक घडवताना दोघांनाही समाधान वाटते. विद्यार्थ्यांनीही त्यांच्याप्रमाणे सैनिक व्हावे, अशी दोघांचीही भावना असून त्या दृष्टीने विद्यार्थी परिपूर्ण व्हावेत, यासाठी ते प्रशिक्षण देत असतात. विद्यार्थी जेव्हा त्यांचे सैन्यातले व युद्धाचे अनुभव ऐकतात, तेव्हा रोमांचित होतात व त्यांच्यासारखे व्हायचे, हे मनोमन ठरवतात. कमलसिंग थापा यांना मिळालेली शौर्यपदके पाहताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे भाव त्यांना सार्थकतेचे समाधान देतात. विद्यार्थ्यांचा उत्साह त्यांना नवी उमेद देतो व हे विद्यार्थी नक्कीच आपल्यासारखे कार्य करतील, असा दोघांनाही विश्वास वाटतो.( प्रतिनिधी)