जिवतीच्या पहाडावर घुमतेयं जलदिंडीचा गजर
By Admin | Updated: June 3, 2015 01:31 IST2015-06-03T01:31:38+5:302015-06-03T01:31:38+5:30
महाराष्ट्र शासनाच्या महत्वकांक्षी जलयुक्त शिवार अभियान कार्यक्रमाअंतर्गत जिवती या दुर्गम तालुक्यात जलदिंडीचा समारोपीय कार्यक्रम गढ पांढरवाणी येथे घेण्यात आला.

जिवतीच्या पहाडावर घुमतेयं जलदिंडीचा गजर
शिवार भेट अभियान : अनेक कामे मंजूर
जिवती : महाराष्ट्र शासनाच्या महत्वकांक्षी जलयुक्त शिवार अभियान कार्यक्रमाअंतर्गत जिवती या दुर्गम तालुक्यात जलदिंडीचा समारोपीय कार्यक्रम गढ पांढरवाणी येथे घेण्यात आला. याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी वानखेडे मंडळ कृषी अधिकारी प्रशांत मडावी, दिनकर कुळसंगे प्रामुख्याने उपस्थित होते.
सर्वप्रथम आदिवासी नृत्यच्या द्वारे गावातून जलदिंडी रथाची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर शेतकऱ्यांना जलयुक्त शिवार अभियानाबाबत राज वानखेडे यांनी माहिती दिली. सोबतच एलसीटी प्रोजेक्टरद्वारे गावकऱ्यांना योजनेच्या महत्वाविषयी लघुचित्रपट दाखविण्यात आला.
जिवती तालुक्यात अभियानांतर्गत एकूण २५ गावाची निवड करण्यात आली असून कृषी विभाग, जिल्हा परिषद सिंचन विभाग, पंचायत समिती, जलसंधारण, वन विभाग आणि पाणी पुरवठा विभागाद्वारे या २५ गावात सिमेंटचे बंधारे, मातीचे बांध, माती नाला बांध, दगडी बांध, साठवण तलाव आणि जुन्या जलस्त्रोयांची दुरुस्ती व गाळ काढणे यासारखी कामे मोठ्या प्रमाणात घेण्यात आली असून गावकऱ्यांचा व शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग दिसून येत आहे.
जिवती तालुक्यातील शेती कोरडवाहू असून निसर्गाच्या लहरीपणाचा फटका दरवर्षी शेतक्यांना बसतो. त्यामुळे पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडविणे गरजेचे आहे. या साठविलेल्या पाण्यातून पिण्याचे पाणी, जनावरांना पाणी व शेतीच्या सिंचनाकरिता पाणी वापरता येणार असून भूगर्भातील पाण्याच्या पातळीत मोठी वाढ होऊन पाणीटंचाईवर मात करणे शक्य होणार आहे.
कार्यक्रमाचे संचालन योगेश केळकर तर प्रास्ताविक प्रशांत मडावी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषी पर्यवेक्षक, बीटीएस खिराडे यांनी विशेष प्रयत्न केले. (तालुका प्रतिनिधी)