कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा मोर्चा
By Admin | Updated: July 25, 2015 01:14 IST2015-07-25T01:14:36+5:302015-07-25T01:14:36+5:30
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्या दीर्घकाळापासून प्रलंबित असल्यामुळे त्याकडे लक्ष वेधण्यासाठी विज्युक्टाचे ..

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा मोर्चा
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : मागण्यांची शासनाने त्वरित पूर्तता करावी
चंद्रपूर: कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्या दीर्घकाळापासून प्रलंबित असल्यामुळे त्याकडे लक्ष वेधण्यासाठी विज्युक्टाचे जिल्हाध्यक्ष अशोक पोफळे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर बुधवारी मोर्चा काढण्यात आला.
कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांच्या २०१५ च्या बोर्ड परीक्षेच्या पेपर तपासणीत असहकार आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ७ व १३ मार्च २०१५ च्या महासंघासोबतच्या बैठकीत शिक्षण मंत्र्यांनी मान्य केलेल्या मागण्यांवर आजपर्यंत अंमलबजावणी झालेली नाही. तसेच काही मागण्या तीन महिन्यात निकाली काढण्याचे मंत्र्यांनी मान्य केले होते. परंतु आजपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. उलट शासनाकडून नव्याने समस्या निर्माण केल्या जात आहेत. शिक्षकांच्या संच मान्यतेमधील त्रुटी दूर करुन प्रचलित पद्धतीने एप्रिल २०१५ पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात संच मान्यता करण्याचे आश्वासन देऊनही आजपर्यंत संच मान्यता झालेली नाही. उलट सदोष सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आॅनलाईन संच मान्यता करण्याचा प्रयत्न शासनाकडून केला जात आहे. त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजी व असंतोष असून शासनाकडून फसवणूक झाल्याची भावना आहे. तेव्हा शासनाला जागे करण्यासाठी संपूर्ण राज्यातच ९ व १० जुलै रोजी धरणे आंदोलन करण्यात आले होते. याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची शासनाला २० जुलैपर्यंत मुदतसुद्धा दिलेली होती. परंतु शासनस्तरावरुन कोणताही निर्णय न झाल्यामुळे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तसेच यापुढेही निर्णय न घेतल्यास दुसऱ्या टप्प्यात आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशाराही देण्यात आला.
२४ जुलैपासून सर्व कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक मागण्या मान्य होईपर्यंत काळ्या फिती लावून काम करतील. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात २८ जुलैला मुंबई येथील आझाद मैदानावर जेलभरो आंदोलन करण्यात येईल तर चौथ्या टप्प्यात १ आॅगस्टपासून राज्यातील सर्व तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल. राज्यातील ६० हजार कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या भावनांचा शासनाने विचार करावा.
यावेळी निवासी जिल्हाधिकारी संजय दैने यांना निवेदन देण्यात आले. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी मोठ्या संख्येने आंदोलनाच्या प्रत्येक टप्प्यात सहभागी व्हावे असे आवाहन संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रा. अशोक पोफळे, कार्याध्यक्ष प्रा. वासुदेव कांबळे, जिल्हा सचिव प्रा. वसंत माणूसमारे, उपाध्यक्ष प्रा. डॉ. विजय हेलवटे व प्रा. प्रमोद भोयर, संघटन सचिव प्रा. रवींद्र ्रसमर्थ, कोषाध्यक्ष प्रा. सुरेश बुराण, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य प्रा. व्ही. एस. कोटगीरवार, प्रा. रविकांत वरारकर, प्रा. शिवराम रोडे, नंदकिशोर तितीरमारे यांनी केले आहे. (शहर प्रतिनिधी)