जैन समाजाने अल्पसंख्याक योजनांचा लाभ घेऊन प्रगती करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:29 IST2021-02-11T04:29:57+5:302021-02-11T04:29:57+5:30
चंद्रपूर : भारतातील जैन समाजाला २०१४मध्ये अल्पसंख्याक दर्जा मिळाला. भारतीय संविधानातील तरतुदीमुळे मिळालेली ही ओळख आपला धर्म, इतिहास व ...

जैन समाजाने अल्पसंख्याक योजनांचा लाभ घेऊन प्रगती करावी
चंद्रपूर : भारतातील जैन समाजाला २०१४मध्ये अल्पसंख्याक दर्जा मिळाला. भारतीय संविधानातील तरतुदीमुळे मिळालेली ही ओळख आपला धर्म, इतिहास व परंपरांची अस्मिता कायम ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे शिक्षण, उद्योग, व्यवसाय व सामाजिक उत्कर्षासाठी अल्पसंख्याक याेजनांचा लाभ घेऊन जैन समाजाने प्रगती करावी, असे आवाहन ऑल इंडिया जैन मायनाॅरिटी फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांनी केले. सराफा लाईनमधील जैन मंदिरात बुधवारी आयोजित जागृती अभियान कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी ऑल इंडिया जैन मायनाॅरिटी फेडरेशनचे महामंत्री संदीप भंडारी, विनय, सकल जैन समाजाचे उपाध्यक्ष योगेश गांधी उपस्थित होते. राष्ट्रीय अध्यक्ष गांधी म्हणाले, जैन समाज हा सर्वाधिक कर देणारा व उच्चशिक्षित समाज आहे. दानधर्म करण्यातही पुढे आहे. उद्योग-व्यवसायात अग्रेसर असला तरी देशभरात जैन समाजातील सुमारे ३० टक्के घटक आजही गरिबीत जीवन कंठत आहेत. त्यामुळे समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या अल्पसंख्याक योजनांचा उपयोग केला पाहिजे. मात्र, योजनांच्या माहितीपासून जैन समाज अनभिज्ञ आहे. यासाठीच ऑल इंडिया जैन मायनाॅरिटी फेडरेशनकडून जागृतीचे कार्य सुरू असल्याचे गांधी यांनी सांगितले. सम्राट अशोकाच्या काळात या देशात ४० जैन समाज होता, असा इतिहास सांगतो. परंतु, आपण स्वत:पासूनच दूर जात असल्याने जैन समाज आज असंघटीत आहे, अशी खंतही गांधी यांनी व्यक्त केली. शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन समाजाला प्रगतीच्या दिशेने नेण्यासाठी २२ राज्यांमध्ये ऑल इंडिया जैन मायनाॅरिटी फेडरेशनच्या ६५० शाखा कार्यरत आहेत. समाजातील विधवा महिलांना दरमहा ५ हजारांची मदत केली जाते, असेही गांधी यांनी सांगितले. योगेश भंडारी यांनी अल्पसंख्याक संकल्पनेचे महत्त्व सांगून योजनांची माहिती दिली. सूत्रसंचालन राजेंद्र लोढा यांनी केले. यावेळी रवींद्र बैद्य, जितेंद्र चोरडिया, अमर गांधी, जितेंद्र मेहर, राज पुगलिया, निर्भय कटारिया, पेनबाबू भंडारी, जितेंद्र जोगड, यश मुनोत, महेंद्र मंडलेचा, राजेश डागा आदी जैन बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.
- तर दरवर्षी मिळू शकतो ५०० कोटींचा निधी
केंद्र व राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने जैन समाजासाठी अल्पसंख्याक विभागाकडून सात वर्षांत ६३० कोटींचा निधी मिळू शकला. यातून जैन समाजात विविध उपक्रम राबवता आले. देशभरात जागृती झाली तर दरवर्षी ५०० कोटींचा निधी मिळू शकतो. त्यामुळे जैन समाजाने स्वत:पुरताच विचार न करता, देशभरातील गरीब जैन समाजाचाही विचार करावा, असे आवाहन फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांनी केले.